नेवरा मारुती मंदिराजवळ भीषण अपघात; चालक फरार, ग्रामस्थांनी पाठलाग करून वाहन अडवले
साईमत/शिरसोली/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील शिरसोली ते वावडदा मार्गावर शनिवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाने समोरून जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश अशोक पाटील (वय ३७, रा. शिरसोली प्र. बो.) हे १४ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता आपल्या हिरो स्प्लेंडर (क्रमांक एमएच १९ बीडी ११६५) या दुचाकीने शिरसोलीकडून वावडदाकडे जात होते. नेवरा येथील मारुती मंदिराजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच २० ईजी ६५२९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की जगदीश पाटील यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वाहनचालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, प्रसंगावधान राखत काही ग्रामस्थांनी वाहनाचा पाठलाग करून नायरा पेट्रोल पंपाजवळ ते अडवले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक अनिल वसंत पवार व इतर ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील जगदीश पाटील यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेने शिरसोली परिसरात शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिंद्रा वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त मार्गावर वाढता वेग आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू असून, प्रशासनाने या मार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
