श्रीमद् भागवत कथेचे प्रभावी प्रवचन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर (धुळे) येथील सुप्रसिद्ध कथा प्रवक्त्या
साईमत/जळगाव /प्रतिनिधी
शहरातील धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक सुसंस्कृत व भक्तिमय करणाऱ्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. श्री गणाधीश फाउंडेशन मित्र मंडळातर्फे भोईटे नगर रोडवरील गौरी प्राईड परिसरात या भव्य संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, दि. १ फेब्रुवारीपासून ८ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत भाविकांसाठी कथा खुली ठेवण्यात आली आहे.
या अध्यात्मिक ज्ञानयज्ञाचा शुभारंभ रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य ग्रंथ मिरवणूक व कलश यात्रेने करण्यात आला. परिसरातून निघालेल्या या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेत सहभाग नोंदविला, तर पुरुष, युवक व बालगोपालांनी हरिनामाच्या जयघोषात सहभागी होत वातावरण भक्तीरसात न्हाऊन काढले. मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले.
श्रीमद् भागवत कथेचे प्रभावी प्रवचन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर, देवपूर (धुळे) येथील सुप्रसिद्ध कथा प्रवक्त्या परमपूज्य स्वामी ताई आपल्या मधुर, ओघवत्या व संगीतमय वाणीतून सादर करीत आहेत. त्यांच्या कथाकथनशैलीमुळे भागवताचे गूढ तात्त्विक अर्थ सहज व हृदयस्पर्शी पद्धतीने भाविकांपर्यंत पोहोचत असून, कथा ऐकण्यासाठी शहरातील विविध भागांतून तसेच परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत.
कथाकाळात भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे, तसेच भक्ती, ज्ञान व वैराग्याचे महत्त्व प्रभावीपणे उलगडले जात आहे. या ज्ञानयज्ञातील विशेष आकर्षण म्हणून गुरुवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तिभावात श्रीकृष्ण विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या दिवशी भाविकांची विशेष गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमाचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री गणाधीश फाउंडेशन मित्र मंडळाचे आयोजक रविंद्र बाबुराव सोनार व पवन सोनार यांनी केले आहे. कथास्थळी शांतता, शिस्त व भक्तिभाव राखत या अध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.
