साईमत पुणे प्रतिनिधी
मराठी साहित्य आणि वैचारिक प्रकाशन क्षेत्रातील मोलाची भर घालणारे ‘मनोविकास प्रकाशन’चे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर (वय ७३) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून काविळीच्या विकाराने आजारी असलेल्या पाटकर यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा जीव गेल्या. पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कम्युनिस्ट कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.
तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केलेल्या अरविंद पाटकरांनी गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला, आणि त्या टप्प्यावर अभिनव प्रकाशनचे वा. वि. भट यांनी त्यांना मोलाची मदत केली.
पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव असलेले पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, नंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पुस्तक विक्री करत त्यांनी वाचकांशी थेट संवाद वाढवला.
मुंबई महानगरपालिकेच्या जिमखानातून ओल्ड कस्टम हाऊस आणि रिझर्व्ह बँकेच्या इमारतीपर्यंत, अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन करत पाटकर यांनी वाचकवर्गाची जाणीव आणि साहित्याची पोच अधिक विस्तृत केली. अखेर ४ एप्रिल १९८४ रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकास प्रकाशनाचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. भट यांच्या पाठिंब्याने ‘शाहीर’ हे मनोविकास प्रकाशनाचे पहिले पुस्तक १९८५ मध्ये प्रकाशित झाले.
त्यांच्या पुढील वर्षांमध्ये मनोविकास प्रकाशनाने वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली. २००५ पासून पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तिथून प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले. त्यांच्या कार्याची दखल राज्य सरकारने श्री. पु. भागवत पुरस्काराने घेतली होती.
अरविंद पाटकर यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि वैचारिक प्रकाशन क्षेत्राला अपूरणीय तोटा बसला आहे. त्यांच्या कार्याची आठवण आणि साहित्यिक योगदान कायम जिवंत राहणार आहे.
