‘लाडक्या बहिणीं’चा संयम सुटला दोन महिने उलटूनही हप्ता न मिळाल्याने महिला व बालकल्याण कार्यालयावर धडक
साईमत/ जळगाव/प्रतिनिधी –
राज्य सरकारची महिलांसाठीची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हप्त्याची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या लाभार्थी महिलांनी आज थेट जळगाव येथील महिला व बालकल्याण विकास विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अचानक झालेल्या या गर्दीमुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
जिल्ह्यातील हजारो महिलांनी या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, तांत्रिक प्रक्रिया तसेच केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या बँक खात्यात अद्याप अनुदान जमा झालेले नाही, अशी तक्रार आहे. या संदर्भात विचारणा करण्यासाठी पहाटेपासूनच जिल्हाभरातून महिला कार्यालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून “येथे कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत किंवा त्रुटी दुरुस्ती केली जाणार नाही; संबंधित अंगणवाडी सेविकांकडेच जा,” असे उत्तर मिळाल्याने महिलांचा संताप अनावर झाला.
लांबचा प्रवास करून, घरातील जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आलेल्या महिलांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “अंगणवाडी सेविकांकडून काम होत नाही म्हणूनच आम्ही येथे आलो, मग पुन्हा तिथेच का पाठवले जात आहे?” असा सवाल अनेक महिलांनी उपस्थित केला. काही महिलांनी प्रशासकीय यंत्रणेतील दिरंगाई, टोलवाटोलवी आणि समन्वयाचा अभाव यावर सडकून टीका केली. “आम्ही वारंवार चकरा मारत आहोत, पण जबाबदार अधिकारी ठोस उत्तर देण्यास तयार नाहीत,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे आणि तांत्रिक अडचणी वेळेत न सुटल्याने लाभार्थी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. जोपर्यंत थकीत हप्त्याची रक्कम खात्यात जमा होत नाही आणि समस्यांवर ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार संतप्त महिलांनी व्यक्त केला आहे. महत्त्वाकांक्षी योजनेची विश्वासार्हता टिकवायची असेल, तर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून महिलांना दिलासा देणे गरजेचे असल्याचे चित्र या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
