किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून
साईमत/ जळगाव(आव्हाने )/प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात गुरुवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. किरकोळ वादातून चौघांनी संगनमताने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ३२ वर्षीय सागर दिलीप बिऱ्हाडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २३) नातेवाईकांसह लहुजी शक्ती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सागर बिऱ्हाडे यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघा आरोपींनी सागर यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत सागर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून, त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
उर्वरित तीन आरोपी अजूनही मोकाट असल्याने बिऱ्हाडे कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी नातेवाईक, समाजबांधव आणि लहुजी शक्ती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले. “जोपर्यंत सागर बिऱ्हाडे यांच्या हत्येतील सर्व आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.
या आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी तत्काळ चोख बंदोबस्त तैनात केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने खुनाचा तपास वेगाने सुरू असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आल्याचे आश्वासन दिले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.एका तरुणाचा अशा पद्धतीने झालेला निर्घृण खून बिऱ्हाडे कुटुंबासाठी अपार दुःख घेऊन आला असून, संपूर्ण आव्हाने गावात शोककळा पसरली आहे. गावात शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, पुढील तपास सुरू आहे.
