नवरात्रीत रणरागिणींकडून ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आग्रहाची मागणी
साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :
‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनाव्दारे केलेल्या मागण्या
उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला आजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र स्वरुपाचा ‘लव्ह-जिहाद विरोधी कायदा’ राज्यात लागू करावा. यासाठी येत्या अधिवेशनात ठोस भूमिका घ्यावी. या प्रकरणांचा तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची स्वतंत्र नोंदी करावी. लव्ह-जिहाद प्रकरणांमागे असणारा विदेशी अर्थपुरवठा, बँक खाती, युवतींची तस्करी व दहशतवादी कारवायांसाठीचा वापर यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. जबरदस्तीने लव्ह जिहाद, तसेच धर्मांतरास मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती, जिहादी संघटना, धार्मिक नेते (मौलवी-मुल्ला) आणि मदरसे-मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी.
नवरात्रीत गरबा मंडप आणि इतर सार्वजनिक नवरात्री आयोजनांमध्ये प्रवेशासाठी आधारकार्डसारखे शासकीय ओळखपत्र अनिवार्य करावे. यामुळे कोणतीही व्यक्ती आपली ओळख लपवून प्रवेश करू शकणार नाही. महिला तसेच बाल आयोग व गृह खात्याने तक्रार निवारण सुविधेतून तत्पर प्रतिसाद द्यावा. सरकार, धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी महिला सुरक्षेसाठी ‘मै हूं दुर्गा’, ‘रणरागिणी’ यांसारखे अभियान राबवून ‘लव्ह जिहाद’ व अन्य सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात फलक, जाहिराती, सोशल मिडीया यांद्वारे जागृती करावी.
यावेळी युवती आणि महिलांनी हातात वैशिष्ट्यपूर्ण फलक धरले होते. ज्यावर ”लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ…गुलाब भाऊ !, भाऊबीजेची हि भेट द्या ना…लव्ह जिहाद विरोधी कायदा करा ना !, भाऊ, आमची सुरक्षा तुमच्या हाती…राज्याला गरज लव्ह जिहाद विरोधी कायद्याची!’ अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणी सायली पाटील, धनश्री दहिवदकर, गायत्री मराठे, ख़ुशी चौधरी सनातन संस्थेच्या सौ. सुवर्णा साळुंखे, नंदा नागणे, अनिता पोळ, साधना पाटील, ज्योती चौधरी यांच्यासोबत पाळधी, खर्ची, एकलग्न, आव्हानी, फुलपाट, पथराड आणि जळगाव शहर येथील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या युवती, सनातन संस्थेच्या साधिका आणि स्थानिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.