‘पीआरपी’चे धरणे आंदोलन, प्रशासनाला आंदोलनकर्त्यांची चेतावणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव रेल्वे स्टेशनला ‘खान्देशकन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी’ यांचे नाव देणे तसेच मुंबई दादर येथील रेल्वे स्टेशनला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभुमी स्टेशन’ असे नाव देण्याच्या मागणीसाठी बुधवारी, २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत जळगाव रेल्वे स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पीपल्स रिपब्लिकन पार्टीने धरणे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, जिल्हाध्यक्ष राजुभाई मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सुरूवातीला महामानवाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मध्य रेल्वेच्या काही स्टेशनवर गाड्यांची येण्या-जाण्याची घोषणा करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सन्मानाने पूर्ण उल्लेखाने सांगणे, उदा. “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई”. महाराष्ट्रातील सर्व फलक, रस्ते, हॉटेल, दुकान, मॉल आदी ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी नाव असलेल्या फलकांचे बदल करून शासनाद्वारे सन्मानासह नावाचा उल्लेख करणे आदींचा समावेश आहे.
यांचा होता सहभाग
आंदोलनात महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, युवानेते सिद्धांत मोरे, महानगराध्यक्ष नारायण सपकाळे, उपाध्यक्ष शांताराम अहिरे, सरचिटणीस प्रा. चंद्रशेखर अहिरराव, साहित्यिक बाबुराव वाघ, कायदेशीर सल्लागार अॅड. आनंद कोचुरे, शहर उपाध्यक्ष शंकर भोसले, तालुकाध्यक्ष रमेश रंधे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे.