आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्राविरुध्द आंदोलन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) समोर उभारलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधीसह रोगराई पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच्या निषेधार्थ बुधवारी, १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयटीआयच्या विद्यार्थ्यांना घेऊन मनपाविरोधात धडक आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत संताप व्यक्त केला. दरम्यान, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या आयुक्तांना निवेदनही दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कचऱ्याचा ढीग उघड्यावर टाकल्यामुळे माशा, डास, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी विद्यार्थी, शिक्षक, परिसरातील नागरिक गंभीर आजारांच्या विळख्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उघड उल्लंघन होत आहे. मनपाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क हिरावला जात आहे. त्याठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनसारखी प्रतिष्ठित संस्था असल्याने येथे स्वच्छ व सुरक्षित वातावरण आवश्यक आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. मुलांच्या शिक्षणासह आरोग्य धोक्यात घालणारी अशी परिस्थिती आता सहन केली जाणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. कचरा संकलन केंद्र तातडीने व कायमस्वरूपी हटविले गेले नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून उग्र आंदोलन केले जाईल. त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर राहील, अशी स्पष्ट चेतावणी मनसेने दिली आहे. स्वच्छ भारत अभियान राबविणाऱ्या संस्थेनेच शहराच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग लावणे ही जळगावकरांसाठी लज्जास्पद बाब असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
मनपाला दहा दिवसांचा ‘अल्टिमेटम’
आंदोलनावेळी महानगरपालिकाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत येत्या दहा दिवसात या समस्येवर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन दहा दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मनपाला दहा दिवसांचा ‘अल्टिमेटम’ असणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी लक्षात आणून दिले.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, रज्जाक सय्यद, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, दीपक राठोड, प्रदीप पाटील, भूषण ठाकूर, राहुल चव्हाण, विशाल जाधव, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे यांच्यासह शासकीय आयटीआयच्या शिक्षकांसह विद्यार्थीही सहभागी झाले होते.