काकोडा येथील सरपंच अपात्र

0
32

मुक्ताईनगर प्रतिनिधी : ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून काकोडा (ता.मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून अनार्ह (अपात्र ) ठरविण्यात आलेले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ ऑगस्ट रोजी काढलेला आहे.

कांबळे हे २०२१ पासून काकोडा ग्रामपंचायतचे सरपंच होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ नुसार सरपंच तुळशीराम कांबळे यांनी ग्रामसभेच्या बैठका घेतल्या नाहीत. तसेच तीन वर्षात केवळ एकच ग्रामसभा घेतली. सरकारी पैशांचा गैरवापर, ग्रामनिधी तसेच विविध योजनांचा निधीचा गैरवापर, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच बोगस बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. याप्रकरणी काकोडा ग्रामपंचायत सदस्य मनोज निंबाजी हिवरकर, ग्रामपंचायत सदस्या उर्मिला विलास भोजने, ग्रामपंचायत सदस्या उषा नितीन सवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल केले होते. सदस्यांतर्फे ॲड.राजेश तिवारी यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र. १४०/२०२५ नुसार जळगाव जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात कामकाज चालू होते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे १४ (ज ३) अन्वये निकाल पत्रानुसार ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सरपंच तुळशीराम कांबळे यांना सरपंच पदावरून अनर्ह ठरविलेले असल्याचा आदेश काढण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here