रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी ; जिल्हापेठ पोलिसात अकस्मातची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सासरी कामानिमित्त दुचाकीने जळगावात आलेल्या जावयाचा १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अपघात घडला. त्यात गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची घटना घडली. सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२ रा. रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे मयत झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केली होती.
सविस्तर असे की, नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे सागर सूर्यवंशी हे आपल्या आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ यांच्यासह वास्तव्याला होते. ते १४ जुलै रोजी जळगावातील दशरथ नगरातील सासरी कामानिमित्त दुचाकीने आले होते. १५ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सागर सूर्यवंशी दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असतांना स्पिड ब्रेकरवर त्यांची दुचाकी आदळली होती. त्यात ते जमीनीवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, बुधवारी, १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास पो.हे.कॉ. भरत लिंगायत करीत आहे.