खरीप पेरण्यांना आला वेग, कृषी विभागाची माहिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यात सुमारे ७ लाख ४६ हजार ४६ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र आहे. त्यापैकी बागायती ऊस वगळता ७ लाख ४० हजार ५३६ हेक्टर क्षेत्रापैकी ६ लाख ८८ हजार ८०० हेक्टरवर खरीप वाणांची पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. जूनच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात झालेल्या पावसाने सुरूवातीस काही दिवस खंड दिला होता. परंतु आर्द्रा नक्षत्रात अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत सरासरी ९३ टक्के खरीप पेरण्या झाल्या आहेत.
यंदा ५ लाख ४६ हजार ९३३ हेक्टरवर कपाशी वाणाच्या लागवडीचा अंदाज होता. त्यात बरीच घट झाली आहे. सद्यस्थितीत केवळ ४ लाख २९ हजार ५८० हेक्टरवर बागायत आणि जिरायत कपाशी वाणाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात मका वाणाची लागवड ९२ हजार ६५० हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु प्रत्यक्षात १ लाख ७४ हजार ३३९ हेक्टरनुसार १८८ टक्के मका वाणाची लागवड झाली आहे. त्यात सर्वात जास्त भुसावळ तालुक्याने आघाडी घेतली आहे. २ हजार ४५ हेक्टर लागवड अपेक्षित असताना तब्बल ५ हजार ५७३ तर पारोळा तालुक्यात २ हजार ८५७ हेक्टरऐवजी ७ हजार ५५३ हेक्टर अर्थात २६४ टक्के क्षेत्रासह अन्य तालुक्यात सरासरीनुसार १८८ टक्के क्षेत्रात मका वाणाची लागवड झाली आहे.