Jalgaon District Administration : जळगाव जिल्हा प्रशासन लागले निवडणुकीच्या कामाला

0
30

प्रशासनाकडून २२ जुलैला होणार मतदान यंत्रांची तपासणी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने सद्यस्थितीला तयारी सुरू केली आहे. सरपंचपद आरक्षणासह गट-गण रचनाही केली जात आहे. दुसरीकडे इच्छुकांकडूनही मोर्चेबांधणीसह राजकीय नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. प्रशासनाकडून २२ जुलैला मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील तीन हजार २३१ कंट्रोल तर तीन हजार ३३२ बॅलेट युनिट जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०११ च्या लोकसंख्या व मतदार वाढ लक्षात घेता प्रारूप प्रभाग, गण-गट रचना तयार केली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. ऑगस्टदरम्यान त्यावर सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, पंचायत आदी सार्वत्रिक निवडणूक मतदारसंख्या, बदल झालेले गण, गट यासंदर्भात प्रारूप आराखडा तयार केला आहे.यासंदर्भात २२ जुलैला प्रत्येक तहसील कार्यालयात मतदान यंत्रांची प्राथमिक स्तरावर तपासणी होणार आहे. त्यानंतर स्थितीचा आढावा घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडे मतदान यंत्रांची मागणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.

प्रशासन प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्पर

१ जुलैच्या नोंदणीनुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यास पालिकानिहाय मतदार संख्या निश्चिती केली आहे. मुक्ताईनगर आणि शेंदुर्णी नगरपंचायतींसाठी ४४ हजार ८५९, अन्य १६ पालिकांसाठी आठ लाख ४६ हजार १५४ मतदार तर जिल्हा परिषदेसाठी २४ लाख २ हजार ४०२ मतदार असतील. महसूल दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींची घरी जाऊन भेट घेतली जात आहे. त्यातून त्यांच्या प्रश्नांना निकाली काढण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचा विश्वासही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.

यंत्रांच्या तपासणीवेळी उपस्थितीचे आवाहन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची पाचवी बैठक घेतली. बैठकीत मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींची नियुक्ती, मतदार याद्यांची तपासणी आणि २२ जुलैला मतदान यंत्रांच्या तपासणीवेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here