जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवानांना वीरमरण, दोन अतिरेक्यांना कंठस्नान

0
26
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवानांना वीरमरण, दोन अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू, वृत्तसंस्था । पाच दिवसांपासून पूँछ जिल्ह्यात अतिरेक्यांशी चकमक सुरू असून, त्यांना ठार मारण्यासाठी पॅरा कमांडो व लढाऊ हेलिकाॅप्टर्सची मदत घेतली जात आहे. भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले आहेत. घनदाट जंगलात अतिरेकी लपल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सैनिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अतिरेक्यांवर उखळी तोफांचा मारा व रॉकेटस् डागले जात आहेत. पाच दिवसांत लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत, तर गुरुवारी रात्री रायफलमॅन विक्रमसिंह नेगी (२६) आणि रायफलमॅन योगंबर सिंह (२७, दोघेही रा. उत्तराखंड) या दोघांना वीरमरण आले. सूत्रांनुसार जंगलांत अतिरेक्यांना शोधण्यासाठी लष्कराने आपले विशेष कमांडो व पॅरा कमांडो तैनात केले आहेत. अतिरेक्यांचे अस्तित्व पाहून लष्कराने राजौरी-पूँछ महामार्गावर वाहतूक बंद केली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक (राजौरी-पूँछ रेंज) विवेक गुप्ता यांनी सांगितले की, अतिरेक्यांच्या हालचालींवर आम्ही निर्बंध आणले आहेत. अतिरेक्यांचा हा गट दोन-तीन महिन्यांपासून येथे होता.

घनदाट जंगल व डोंगराळ क्षेत्र असल्यामुळे कारवाई करण्यात खूप अडचणी येत आहेत, असे सैन्याच्या प्रवक्त्याने म्हटले. गुरुवारी रात्री जवान नार खास जंगलात अतिरेक्यांना शोधत होते, तेव्हा झाडांमागे लपलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात दोन रायफलमॅन जवान शहीद झाले. त्यानंतर घनदाट जंगलात लपलेल्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here