सरकार विरुध्द निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
एकीकडे मराठीच्या मुद्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतांना जळगावात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आंदोलन केले. जळगावमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना उबाठा आणि मनसे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. येथे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित आंदोलन केले. याप्रसंगी सरकार विरुध्द निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. आंदोलनात पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली. दरम्यान, राज्यात शिवसेना उबाठा आणि मनसे अधिकृतपणे एकत्र येण्यापूर्वीच जळगावात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात एकच चर्चा आता सुरु झाल्याचे चित्र आहे.
सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उध्दव आणि राज ठाकरे एकत्र येणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंकडून एकत्र येण्याचे अनेकदा संकेत देण्यात आले असले तरी याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा केलेली नाही. राज्यात अलीकडेच पहिलीपासून हिंदी शिकविण्याच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला शिवसेना उबाठा आणि मनसे अशा दोन्ही पक्षांनी प्रखर विरोध केला आहे. त्यातूनच दोन्ही ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा होत आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज यावरुन जळगावातही हेच चित्र दिसून आले.
आंदोलनात यांचा होता सहभाग
आंदोलनात शिवसेना उबाठाचे उपनेते गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर कुलभूषण पाटील, भाऊसाहेब सोनवणे, विजय बांदल, मनीषा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मालिक, युवक अध्यक्ष रिंकू चौधरी, गौरव वाणी, आकाश हिवाळे, मनसेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, जळगाव शहर उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, प्रदीप पाटील, संदीप मांडोळे, मनोज लोहार, विलास सोनार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शहर सचिव जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.