नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना मनसेने दिले निवेदन
साईमत/यावल/प्रतिनिधी :
शहरातील वैकुंठधामात (स्मशानभूमी) लाईट लावणे, स्वच्छता ठेवणे तसेच यावल शहरात कीटकनाशक धुर फवारणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केली आहे. यासंदर्भात यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेने केली आहे. निवेदनावर मनसेचे राज्य उपाध्यक्ष जनहित विभाग चेतन आढळकर, किशोर नन्नवरे, गौरव कोळी, शाम पवार यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री, आयुक्त नाशिक, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यावल शहरातील व्यास मंदिराच्या मागील वैकुंठधामात लाईटची व्यवस्था नाही. त्याठिकाणी एकच हायमस्ट लावला आहे. उर्वरित ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही. वैकुंठधामात सायंकाळी अग्नीडाग देतांना पुरेसा प्रकाश नसतो. स्मशानभुमीतील गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित न.पा. प्रशासनाने वैकुंठधामाची योग्य देखभाल दुरुस्ती करावी. तसेच यावल शहरातील नाले सफाई झाली आहे.काही ठिकाणी न झाल्यासारखी आहे. पूर्ण यावल शहरात नालेसफाई करून शहरात अस्वच्छतेमुळे हिवतापाच्या साथीच्या उद्रेक वाढला आहे. डेंग्यू, चिकनगुन्या, मलेरीया अशा प्रकारच्या साथीचे आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजारांचा उद्रेक होत असतांना नगरपरिषद केवळ स्वच्छतेच्या नावाखाली धुळफेक करीत आहे.
तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
यावल शहरात प्रत्येक प्रभागात धुर फवारणीचे नियोजन करावे. त्यानुसार सकाळी धुरळणी, सायंकाळी फवारणी केली गेली पाहिजे. यावल शहरातील प्रत्येक वार्डनिहाय नियोजन करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याची प्रक्रिया राबविली पाहिजे. लवकरच सर्व मागण्या मान्य करुन तसे नियोजन करावे, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यास भाग पाडू नका. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.