Arrival Of Varun Raja In Jalgaon : जळगाव शहरासह जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

0
23

झाडे उन्मळून पडली, बॅनरही उडाले, वीज खंडित, जळगावातला ‘बजरंग’ बोगदा तुंबला

साईमत/जळगाव/चमुकडून :

बुधवारी, ११ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानक वादळ, वारा आणि विजेच्या कडकडाडात मृग नक्षत्राच्या पावसाचे शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार आगमन झाले. त्यामुळे जळगाव शहरात बहुतांश ठिकाणी महावितरणने वीज ‘गुल’ केल्याने अंधार पसरला होता. काही झाडे उन्मळून पडली होती. वादळ, वाऱ्यासह विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमीप्रमाणे वीज खंडित केली होती. शहरात काही ठिकाणी बॅनरही वादळामुळे पडल्याचे सांगण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात नुकसानीची उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. जळगावातला ‘बजरंग’ बोगदाही नेहमीप्रमाणे आजच्या पहिल्याच पावसात तुंबला होता. दरम्यान, जामनेर तालुक्यातील पहुरलाही तुरळक पावसाचे आगमन झाल्याचे सांगण्यात आले.

अवकाळी पावसानंतर वातावरणात प्रचंड बदल होऊन उकाडा वाढल्याने सर्वच हैराण झाले होते. जून महिन्यातले मृग नक्षत्र लागल्यापासून पेरणीलायक पाऊस पडेल आणि पेरणी सुरू होईल, अशा आशेने शेतकरी आकाशाकडे टक लावून पावसाची चातकासारखी वाट पाहत होते. गेल्या आठवड्यापासून प्रचंड उष्ण हवामान आणि चटके देणाऱ्या उन्हामुळे नागरिक वैतागले होते. बुधवारी, ११ जून रोजी सकाळपासूनच पावसाचे संकेत आणि पाऊस पडण्याचा अंदाज दिसत होता. दरम्यान, सायंकाळी पावसाने अर्धा ते पाऊणतास हजेरी लावल्याने वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे.

जळगाव शहरात पावसामुळे बाधित भागांना अधिकाऱ्यांनी दिल्या भेटी

जळगाव शहरात बुधवारी, ११ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांमध्ये नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बाधित भागांना भेट देत पाहणी केली. संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत मिळावी, यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी रहा, आवश्यकता असल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाचोऱ्यात भाजीपाला व्यावसायिकांची उडाली धावपळ

पाचोऱ्यातील भडगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने रहदारी खोळंबली होती. पावसाचा जोर जास्त असल्याने वाहनचालक आणि वाहने जागेवरच थांबलेली दिसले. शहराच्या मध्यवर्ती न.पा. जीनमधील कृष्णराव व्यापारी संकुलातील अंडरग्राऊंड भाजीपाला मार्केटमध्ये रस्त्यावर वाहणारे पाणी शिरल्याने भाजीपाला व्यावसायिकांची धावपळ उडाली होती. बाजार समितीतही अचानक सुरू झालेल्या पावसामुळे उघड्यावर पडलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ झाली. वादळ, वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. विजेचे खांबही वाकल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीकडून मिळाली आहे.

चाळीसगावला पावसाची जोरदार सुरुवात

चाळीसगाव शहरात बुधवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने शहरभर नागरिकांना धडकी भरविली होती. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना घडण्याची शक्यता नाकारत येत नाही तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची धांदल उडत धावपळ उडाली होती. पावसाच्या जोरदार सरींमुळे रस्त्यावर पाण्याचा जमाव झाला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड, कॅप्टन कॉर्नर याठिकाणी पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात नगरपालिका व आपत्कालीन सेवांनी सतर्कता पाळून नागरिकांना मदत करण्यासाठी पथक तैनात करणे गरजेचे आहे.नागरिकांनीही अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here