पुणे येथे आयोजित प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरणप्रसंगी प्रतिपादन
साईमत/पुणे/प्रतिनिधी :
मराठी समीक्षेत बालसाहित्याची ‘समीक्षा’ ही नेहमीच उपेक्षित आहे. आजही ती तुरळक स्वरूपात दिसून येत असल्याचे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्काराचे शनिवारी, ७ जून रोजी वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह डॉ. वि. दा. पिंगळे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे समन्वयक प्रा. डॉ. वासुदेव वले, डॉ. अशोक कोळी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ.किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांच्या ‘बालसाहित्यातील नवे काही’ आणि डॉ. अनंता सूर (यवतमाळ) यांच्या ‘साहित्य, समाज आणि विचारधारा’ समीक्षा ग्रंथाला तर खान्देशस्तरीय पुरस्कार डॉ. प्रकाश सपकाळे (जळगाव) यांचा ‘समीक्षा विवेक’ आणि डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांचा ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ ग्रंथाला देण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महाराष्ट्रातील भाषातज्ज्ञ डॉ. माधव राजगुरू, आकाशवाणीतील ज्येष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप, डॉ. सोपान बोराटे, पत्रकार संजय ऐलावाड, साहित्य रसिक यांच्यासह किसनराव पाटील यांचे आप्तेष्ट, कुटुंबीय उपस्थित होते.
अध्यक्षांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
भारतातील बालसाहित्यात बंगाली, मल्याळम अशा भाषांमध्ये होणारे लेखन अधिक समृद्ध आहे. मराठीत बालकविता लिहिली गेली. मात्र, बाल कादंबरी लिहिली गेली नाही. ती लिहिली जावी, अशी अपेक्षा भारत सासणे यांनी व्यक्त केली. समारोप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात डॉ. आर. एस. माळी यांनी प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक पैलू उलगडून दाखविले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
मसापसाठी डॉ. किसनराव पाटील यांचे योगदान गौरवास्पद
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी दिलेले योगदान गौरवास्पद असल्याचे सांगितले. जळगाव जिल्हा तसेच विविध तालुक्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखा सुरू करून त्या विस्तारण्यात त्यांचे योगदान अनमोल होते, असे डॉ. वि. दा. पिंगळे यांनी सांगितले. परीक्षक म्हणून मनोगत आणि भूमिका डॉ. योगेश महाले यांनी मांडली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे डॉ. अशोक कोळी, सूत्रसंचालन डॉ. संदीप माळी तर आभार मयूर पाटील यांनी मानले.