विशेष सराव शिबिराप्रसंगी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांचे प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थी खेळाडूंनी शिस्त व सरावातील सातत्य निरंतर ठेवल्यास त्यांना विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त होऊन त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होऊ शकतो, असे प्रतिपादन प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे मैदानी क्रीडा प्रकारातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी खेळाडूंसाठी बुधवारपासुन १२ जूनपर्यंत १० दिवस कालावधीचे विशेष सराव शिबीर आयोजित केले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड.अमोल पाटील, प्रा.म.सु.पगारे, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे-महाजन, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते.
ते पुढे म्हणले की, विद्यापीठाने टॅलेंट सर्च सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा सराव शिबीर आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडा नैपुण्य ओळखुन आजच्या शिबिरात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. खेळाडू विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेऊन आपले क्रीडा नैपुण्य स्पर्धांमध्ये दाखवावे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडु होण्यासाठी परिश्रम करावे. विद्यापीठ नेहमीच खेळाडू विद्यार्थ्यांना मदत करीत असल्याचेही प्रा.एस.टी.इंगळे यांनी सांगितले. खेळाडूंनी मेहनत घ्यावी. आपल्या शंकांचे निरसन प्रशिक्षकांकडून करुन घ्यावे. विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा. विद्यापीठाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील यांनी सांगितले.
शिबिरात १०० मीटर, २०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, ५ हजार मीटर, १० हजार मीटर धावणे तसेच लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, अर्ध मॅरॉथॉन, रिले अशा विविध क्रीडा प्रकारांच्या सराव खेळाडुंकडून करुन घेण्यात येणार आहे. त्याकरीता त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण लाभणार आहे.
सराव शिबिर १० दिवस चालणार
१० दिवस चालणाऱ्या सराव शिबिरात विविध महाविद्यालयाचे निवडक विद्यार्थी व विद्यार्थिंनी खेळाडु सहभागी झाले आहे. शिबिरात सकाळी ३ तास सराव, दुपारी व्याख्यान आणि सायंकाळी ३ तास सराव असे नियोजन केले आहे. सुत्रसंचालन डॉ. शैलेश पाटील तर प्रास्तविक तथा आभार डॉ. दिनेश पाटील यांनी मानले.