Gondkhel Sugar Factory Site : गोंडखेल साखर कारखान्याच्या जागेवर वीज प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन : राजू बोहरा

0
10
oplus_0

कारखाना विक्री करणे हा शेवटचा पर्याय, कारखान्याबाबत दुसऱ्यांदा बोलावली बैठक

साईमत/जामनेर/प्रतिनिधी :

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गोंडखेल साखर कारखान्याबाबत तालुक्यात चर्चा सुरु आहेत. गोंडखेल साखर कारखान्याबाबत दोन पर्याय आपल्यासमोर आहेत. त्यातील पहिला पर्याय साखर कारखाना किंवा इतर उद्योग त्या जागेवर सुरू करणे किंवा शेवटचा पर्याय म्हणजे कारखाना विक्रीस काढणे, असे हे पर्याय आहेत. कारखान्याच्या उभारणीसाठी कारखान्यावर जवळपास १२ कोटी रुपयांचे कर्ज लोकांसह बँकेचे आहे. जिल्हाभरातून ११ हजार लोकांचे शेअर्स कारखान्याकडे जमा आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून लोकांचे व बँकेचे पैसे कारखान्यावर आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. जर या जागेवर इलेक्ट्रीसिटी प्रोजेक्ट सुरू केला तर त्यामाध्यमातून संस्थेला जवळपास ८५ हजार रुपये वर्षाकाठी भाडे मिळू शकते. भाडे करारावर घेणाऱ्या कंपनीकडून आपण ५ वर्षाचे भाडे डिपॉझिट स्वरूपात घेतल्यास साधारण ५ कोटी रुपये आपल्याकडे जमू शकतील. कारखान्यात असलेली मशीनरी एखाद्या कारखान्याला विक्री केल्यास त्यातून ३ ते ४ कोटी रुपये आल्यास ते पैसे बँकेला सरकारच्या मदतीने परत केल्यास व राज्य सरकारला विनंती केल्यास देणेदारांचे व शेअर होल्डरचे पैसे परत करता येतील. येणारे पुढील भाडे बँकेला व राज्य सरकारला व्याजासह परत करता येतील, असे संस्थेमधील जाणकारांचे म्हणणे आहे. तसा प्रस्ताव आल्याचे राजू बोहरा यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या संचालक मंडळांसह शेतकरी, शेअर होल्डर, तालुक्यातील जाणकार मंडळी उपस्थित होते.

साखर कारखाना विक्री झाल्यास त्या वेळेस शेतकऱ्यांनी आपली शेत जमीन अल्पदरात कारखान्यासाठी दिली आहे. आता ते शेतकरी उठाव करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासंदर्भात राज्याचे मंत्री ना.गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेतली. कुठल्याही परिस्थितीत शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी ज्यांची जमीन प्रकल्पासाठी घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना दिले आहे. गोंडखेल येथे गेल्या ३५ वर्षांपासून सहकारी तत्त्वावर उभारण्यात आलेला साखर कारखाना आजतागायत बंदावस्थेत आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसह बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यातून तालुक्याचा विकास होईल, अशा उदात्त हेतूने साखर कारखान्याची उभारणी केली होती. मात्र, कारखान्याला ३५ वर्ष होऊनही कारखाना आजतागायत सुरू होऊ शकला नाही. बंद असलेल्या कारखान्याचे गेल्या १० ते १२ वर्षांपासून सुभाष चंपालाल बोहरा (राजू बोहरा) चेअरमन आहेत. त्यांनी या महिन्यात दुसऱ्यांदा कारखान्याबाबत बैठक बोलावली होती. यासारखे प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही ते म्हणाले.

संस्था वाचविण्यासाठी सहकार्य अपेक्षित

तालुक्यातील राजकीय, अराजकीय लोकांचे संस्था वाचविण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचेही ते बैठकीत म्हणाले. कारखाना विक्री करणे हा शेवटचा उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्या जमीनी कारखान्याने घेतल्या आहेत, त्या जमीनी त्यांनाच परत घ्यायच्या असल्यास आजच्या बाजार भावाच्या हिशोबाने टेंडर काढून शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना खरेदी कराव्या लागतील, हा शेवटचा पर्याय असल्याचेही ते म्हणाले. शेवटी तालुक्याच्या विकासाचा विषय असल्याने काही कठोर निर्णय राजकीय दृष्टीकोनातून न बघता लोकहितांसाठी घेणे आवश्यक असल्याचेही राजू बोहरा शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here