साईमत/यावल/प्रतिनिधी :
गेल्या दोन-तीन वर्षाच्या यावल नगरपरिषदेच्या प्रशासकीय कालावधीत विविध कामांचे नियोजन आणि शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या बौद्धिक क्षमतेच्या बळावर सर्वांना विश्वासात घेऊन कामे करणाऱ्या यावल नगरपालिका पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता व प्रभारी बांधकाम अभियंता सत्यम जयवंतराव पाटील यांची जिल्ह्यात भडगाव येथे बदली झाल्याने यावल नगरपालिका दुष्काळात ‘तेरावा महिना’ याप्रमाणे अडचणीत येणार असल्याचे शासकीय चित्र निर्माण झाले आहे.
पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता सत्यम जयवंतराव पाटील यांनी गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीत आपल्या बौद्धिक क्षमतेच्या आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर विविध योजनांचे काम यशस्वीरित्या पार पाडले. संबंधित शासकीय यंत्रणेसह कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, मजूर वर्ग, लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांना विश्वासात घेऊन कामे केली आहेत. ज्यांच्या सोयीनुसार मर्जीनुसार कामे न मिळाल्याने, राज्यात राजकीय सत्ता बदल झाल्याने तसेच ठेकेदारी वर्गातील बिनाबुडाचा टक्केवारीचा मुद्दा उपस्थित करून काहीजण नाराज झाल्याने शेवटी नगरपालिकेतील त्यांच्या कामकाजाविषयी काहींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
नवीन कर्मचारी कोण कुठून येणार ?
असे असले तरी आता सत्यम पाटील यांची बदली झाल्याने अपूर्ण कामांचा पाठपुरावा नवीन अधिकाऱ्याला त्या प्रमाणात जमणार आहे का..? दैनंदिन कामे यशस्वीरित्या कशी पार पडतील, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. असे असले तरी नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी ३० मे २०२५ रोजी राज्यातील नगर पालिकामधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या (सत्यम पाटील यांच्यासह) केल्याने यावल नगर परिषद आता दुष्काळात ‘तेरावा महिना’ याप्रमाणे अडचणीत येणार आहे.नवीन कर्मचारी कोण कुठून येणार? त्यांना नगरपालिका कामकाजाविषयी पूर्ण माहिती आहे किंवा नाही? आणि नवीन कर्मचारी असल्यास त्याचा विपरीत परिणाम यावल नगरपालिकेच्या विविध कामांवर योजनांवर होणार? अशी चर्चा यावल शहरात सध्या जोरात सुरु आहे.