49 percent voted for Rishikesh : ४९ टक्क्यांनी ऋषिकेशचा घात केला !

0
20

४९ टक्क्यांनी ऋषिकेशचा घात केला !

जळगाव (प्रतिनिधी)-

बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या तीव्र नैराश्यातून ममुराबाद गावात १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली.

जळगाव जिल्ह्यातील ही १२ वी निकालामुळे घडलेली दुसरी आत्महत्या असून या घटनेने पालक आणि शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. आजच एरंडोल तालुक्यातील विद्यार्थ्याने पाचोरा येथे बहिणीच्या घरी कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केली होती.

ऋषिकेश दिनेश पाटील (वय १७ वर्ष, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा तरुण आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. आज दुपारी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात ऋषिकेश पाटील याला ४९ टक्के गुण मिळाले. हे गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला नैराश्य आले. या नैराश्यातूनच त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्देवी घटना आईच्या लक्षात आली. ऋषिकेशच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात जो आक्रोश केला, तो काळजाला चिरणारा होता. उपस्थितांचेही डोळे पाणावले. ऋषिकेशचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे ममुराबाद गावावर शोककळा पसरली आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here