महाराष्ट्रातील राज्यसेवा परीक्षा अभ्यासकांसाठी कृषी घटकाचे महत्त्व कायमच वाढत आहे. या परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक आणि चारमध्ये शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्न सुरक्षा या मुद्द्यांचा समावेश केला जातो. आर्थिक भूगोलाच्या संदर्भात, महाराष्ट्रातील कृषिक्षेत्राचा अभ्यास हवामान विभागांच्या आधारे करणे आवश्यक आहे. मृदेचा प्रकार, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती यांच्या स्वरूप, समस्या, कारण आणि उपायांचा अभ्यास करणे महत्त्वपूर्ण आहे.
शेतीपूरक क्षेत्रे
मत्स्य व्यवसाय: भूप्रदेशांतर्गत आणि अरबी सागरातील मासेमारीचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. यात आवश्यक निविष्ठा, यंत्रे, उत्पादकता, मागणी, समस्या, कारणे आणि उपाय यांचा समावेश असतो. मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण ही संकल्पना उत्पादन, साठवणूक व वाहतूक/वितरण यासाठीची नवीन यंत्रे आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे अभ्यासावी.
पशुसंवर्धन: कृषी उत्पादकतेमध्ये पशुधनाचा महत्त्वाचा वाटा आहे. पशुधनाची संख्या, टक्केवारी व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली राज्ये व राज्यातील जिल्हे यांची माहिती आर्थिक पाहणी अहवालामधून मिळवावी. धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबी क्रांती या योजनांचा आढावा घ्यावा.
अन्न सुरक्षा
अन्न उत्पादन व खप: भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल समजून घ्यायला हवा. मागणीचा कल, साठवणूक, पुरवठा यातील समस्या, कारणे, उपाय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम, उपाय आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे महत्त्व या मुद्द्यांचा अभ्यास करावा. अन्न सुरक्षा अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत करून घ्याव्यात.
कृषी तंत्रज्ञान
उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती (HYV): HYV विकसित करण्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजून घ्यावे. राज्यातील HYV विकसित करणाऱ्या संस्था व कृषी विद्यापीठे, हरीतक्रांतीमध्ये वापरलेली HYV वाणे आणि महाराष्ट्रातील मुख्य पिकांची महत्त्वाची HYV वाणे माहीत असायला हवीत. जनुक संवर्धित (GM) बियाण्यांमागील तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरातील आर्थिक फायदे, तोटे, पर्यावरणीय परिणाम यांचा अभ्यास करावा.
शेतीचे यांत्रिकीकरण: शेतीच्या यांत्रिकीकरणाची आवश्यकता, आर्थिक महत्त्व, फायदे, तोटे, राज्यातील शेतीच्या यांत्रिकीकरणामधील अडथळे, समस्या, कारणे व उपाय या मुद्यांच्या आधारे अभ्यास करावा.