प्रस्तावित ‘मल्टी-ट्रॅकिंग’ रेल्वे प्रकल्पात मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत दोन प्रमुख प्रकल्पांचा समावेश

0
20

गर्दी कमी होण्यास मिळणार मदत, आर्थिक विकासाला मिळेल गती

साईमत/फैजपूर/प्रतिनिधी

प्रस्तावित ‘मल्टी-ट्रॅकिंग’ रेल्वे प्रकल्पांमध्ये मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाअंतर्गत दोन प्रमुख प्रकल्पांचा समावेश असणार आहे. जळगाव– मनमाड चौथी लाइन (१६० कि.मी.) प्रकल्पाची खर्च दोन हजार ७७३ रुपये कोटी, भुसावळ – खंडवा तिसरी आणि चौथी लाइन (१३१ कि.मी.) प्रकल्पाची खर्च तीन हजार ५१४ रुपये कोटी या प्रकल्पांमुळे लॉजिस्टिक क्षमतेत सुधारणा होईल. कारण यामुळे सध्याच्या लाइनची क्षमता वाढवून परिवहन नेटवर्क मजबूत होईल. ज्यामुळे पुरवठा साखळ्यांमध्ये सुधारणा होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. या प्रस्तावित ‘मल्टि-ट्रॅकिंग’ प्रकल्पांमुळे मुंबई आणि प्रयागराज दरम्यानच्या सर्वात व्यग्र मार्गावर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास प्रदान करण्यात येणार आहे. सर्व व्यवहार सुलभ होवू शकतील आणि त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत मिळेल.

प्रस्तुत प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारताच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने तयार केले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनविणे शक्य होईल. तसेच त्यांच्या रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढवू शकणार आहेत. भुसावळ मंडळाच्या दोन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील चार जिल्ह्यांमध्ये (नाशिक, जळगाव, बऱ्हाणपूर आणि खंडवा) जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दोन प्रकल्पांमुळे रेल्वेचे विद्यमान संपर्क जाळ्या विस्तार सुमारे ३१५ किलोमीटरने वाढणार आहे.

गाड्यांच्या वेगात सुधारणा होणार

प्रस्तावित प्रकल्पामुळे मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या धावण्यासाठी सक्षम होवू शकेल. तसेच नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर) आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) मधील ज्योतिर्लिंगांना तसेच धार्मिक स्थळांना जाणाऱ्या यात्रेकरूंना त्याचा लाभ घेता येईल. प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी या ठिकाणां‍व्यतिरिक्त, खजुराहो युनेस्को जागतिक वारसा स्थळ, अजिंठा आणि वेरूळ लेणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ, देवगिरी किल्ला, असीरगड किल्ला, रेवा किल्ला, यावल वन्यजीव अभयारण्य, केओटी धबधबा आणि पूर्वा धबधबा अशा विविध आकर्षक पर्यटन स्थानांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. अशा नवीन रेल्वे प्रकल्पांमुळे या मार्गावरील पर्यटनाला चालना मिळू शकेल.

नवीन चौथी लाइन मनमाड-भुसावळ खंडमधील गर्दी कमी करेल, जो मुंबई-हावड़ा मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या बदलामुळे फक्त ऑपरेशन कार्यक्षमता वाढणार नाही तर संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये गाड्यांच्या वेगात सुधारणा होईल, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल.

मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हीटीला नवीन दिशा मिळणार

भुसावळ-खंडवा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाइन बांधणे हे केवळ क्षेत्रीय विकासासाठीच नाही तर भारतीय रेल्वे नेटवर्क मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे प्रवासी आणि माल वाहतुकीत सुधारणा होईल, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाढ आणि रेल्वेची क्षमता वाढवली जाईल. हे कृषी उत्पादने, खते, कोळसा, पोलाद, सिमेंट, मालवाहक कंटेनर आदींच्या वाहतुकीसाठी हा मार्ग आवश्यक आहे. अशा प्रकारे जळगाव-मनमाड आणि भुसावळ-खंडवा रेल्वे प्रकल्पांद्वारे मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हीटीला नवीन दिशा मिळेल, जे देशभरातील माल आणि सेवा यांचा अधिक चांगला परिवहन करण्यासाठी आवश्यक ठरेल. त्यामुळे भारतीय रेल्वे नेटवर्कच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि आर्थिक क्रियाकल्पांना गती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here