तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या प्रयत्नांना यश
साईमत/यावल/प्रतिनिधी
गेल्या ३ ऑक्टोंबरपासून यावल पंचायत समितीसमोर अनु. जाती-जमातीच्या लोकांना न्याय मिळविण्याकरीता संघटनेच्यावर्तीने आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्यामुळे ठिय्या आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात ५ ऑक्टोंबरपासून संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष यांनी सुरु केले होते. आमरण उपोषण तात्काळ मिटावे, यासाठी यावल तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना गुरुवारी, १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी यश मिळून उपोषणाची सांगता करण्यात आली.
आमरण उपोषण प्रामुख्याने भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत टेंभीकुरण गाव ते पाटसरी रस्त्याचे काम तात्काळ करून घेण्याचे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आश्वासन दिले होते. तसेच टेंभीकुरण गावातील अनु – जाती जमातीच्या लोकांच्या मुलभूत सुविधा व झालेल्या अन्यायाच्या संदर्भात चौकशी कामी त्रिसदस्य समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र संघटनेला यावल तहसीलदार मोहनमाला नाझरिकर यांच्या हस्ते दिले.
याप्रसंगी यावल पो.स्टे.पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व सहायक गटविकास अधिकारी उपस्थित होते. उपोषण सोडतांना संघटेनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी सांगितले की, ही लढाई कुठल्याही मुलभूत सुविधा करीता नसून दलीत आदिवासी समाजाच्या हक्काची आणि मानसन्मानाची होती.
यांनी घेतले परिश्रम
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी इकबाल तडवी, अनिल इंधाटे, विलास तायडे, सागर तायडे, अनिल तायडे, डोमा सोनवणे, मिलिंद सोनवणे, जंगलू बारेला यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.