८ ऑक्टोंबरपासून परीक्षा सुरू होणार
साईमत/यावल/प्रतिनिधी
परीक्षा २ दिवसांवर आली असली तरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाच्या विद्यापीठाच्या परीक्षा मंगळवारी, ८ ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे. परंतु त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हॉल तिकीट अद्यापही विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले नाही. विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड होत नाही. पर्यायी परीक्षा प्रक्रियेत कॉलेज, विद्यापीठ प्रशासनाची चूक विद्यार्थ्यांना महागात पडू शकते.
त्यात त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, मानसिक सर्वच प्रकारचे नुकसान झाल्यास त्या महाविद्यालय व विद्यापीठ कारणीभूत राहील. यासंदर्भात जळगाव जिल्ह्याचे रावेर लोकसभेचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (अजित दादा गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी काही महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी व विद्यापीठाच्या वेबसाईटवर ई-मेलवरून विद्यापीठात तक्रार दाखल केली आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र मिळवून देणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानास विद्यापीठ जबाबदार राहील.
यावल तालुका हा सातपुडाच्या पायथ्याशी येत असल्याने यात दुर्गम भागातून विद्यार्थी परिसरात प्रवेश घेतात. त्यांना प्रवेश पत्रच उशिरा मिळाले किंवा न मिळाल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते, त्याची दखल घेत राकेश सोनार यांनी यावल यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्याशी संपर्क करून विद्यापीठात पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच स्वतः कुलगुरू, उपकुलगुरू यांच्याशी ईमेलच्या माध्यमातून तक्रार केली आहे.