गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग ठरतोय मोलाचा

0
20

पाळधीला “स्वच्छता ही सेवा” अभियानात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

आरोग्याचा खरा मंत्र स्वच्छता आहे. “ स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ” ही प्रत्येकाची वैयक्तिक तसेच सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग मोलाचा ठरत आहे. ही बाब शासनासाठी उत्साहवर्धक आहे. स्वच्छता ही केवळ गरजच नाही तर ती एक सवय झाली पाहिजे. बाह्य स्वच्छते बरोबर मनाची स्वच्छता झाली पाहिजे. यासाठी मन आणि गाव दोन्ही स्वच्छ ठेवा. प्रत्येकाने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी. स्वच्छता करणारे प्रत्येक सफाई कर्मचारी हेच त्या – त्या गावाचे खरे नायक असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे आयोजित “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.*

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘एक पेड माँ के नाम’ यासाठी गुलाबाराव पाटील शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीमप्रमाणे देशभरात मोठ्या उत्साहात राबविले जात आहे. स्वच्छता अभियान केवळ २ ऑक्टोबरपर्यंत मर्यादित राहणार नाही तर त्यानंतरही ते सुरू राहणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

“स्वच्छता ही सेवा”

अभियान अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ कार्यक्रम प्रसंगी स्वच्छतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन याप्रमाणे ४५ सफाई कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छता मित्र’ म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बुके देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘करू या वाईट विचार नष्ट – स्वच्छ करू या आपला महाराष्ट्र’ बाबत सर्वांना स्वच्छतेबाबत तसेच प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला प्रतिबंधाबाबत सामूहिक शपथ देण्यात आली. तसेच सतत स्वच्छता टिकविण्यासाठी संकल्प करण्यात आला.

यांची लाभली उपस्थिती

यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे समन्वयक डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, सरपंच विजय पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, ग्रामविकास अधिकारी डी.डी. पाठक , उपसरपंच दशरथ धनगर, शरद कोळी, प्रा. आ. केंद्राचे डॉ. चेतन अग्निहोत्री, ग्रामपंचायत सदस्य कैलास इंगळे, मच्छिंद्र साळुंखे, राहुल धनगर, निसार शेख, रामचंद्र सोमाणी, शेख मलिक, गणेश माळी, दयानंद कोळी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर , स्वच्छता विभागाचे पी. आर. सी./सी.आर.पी., जिल्ह्यातील स्वच्छता मित्र व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन पाळधी बु. आणि खु. ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक यांनी केले होते. प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, सूत्रसंचालन स्वच्छता तज्ज्ञ मनोहर सोनवणे तर आभार सहायक गटविकास अधिकारी कैलास पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here