लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी ; धरणे, रस्ते निर्मितीसाठी ४६ हजार कोटी रुपये द्या
साईमत।मुक्ताईनगर।प्रतिनिधी
आमदार एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला वाटत नाही. महायुती सरकार आल्यापासून हे सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी सीबीआयसारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नाहीत. लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी द्या आणि त्यासोबतच ४६ हजार कोटी रुपये धरणे, रस्ते निर्मितीसाठी द्या म्हणजे त्यातून स्थायी मालमत्ता निर्माण होईल. त्यामुळं हे सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असं आपल्याला वारंवार वाटत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
‘लाडकी बहीण योजना’ सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणली असल्याचं जनतेलाही कळते, ही योजना आणायची होती तर पाच वर्ष पूर्वीच आणायला पाहिजे होती, असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे, एवढाच खर्च धरणे उभारणी, रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार ही निर्माण होऊ शकणार आहे, त्यासाठीही प्रयत्न करायला हवं, असं एकनाथ खडसे म्हणाले. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभाराबद्दल टीका केली होती. अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, मात्र मी आणि आमच्या लोकांनी पिच्छा सोडला नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले होते.
पाटील यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आपणही अर्थमंत्री राहिलो आहे, अर्थ खात्याचे काम करताना प्राधान्यक्रम ठरून निधी द्यावा लागत असतो. त्याला विलंब होऊ शकतो, असे करणे गरजेचे असते, नाही तर राज्याची तिजोरी एकाच दिवसात खाली होऊ शकते असं खडसे म्हणाले. अजित पवार यांच्या अर्थ खात्याची पाठराखण एकनाथ खडसे यांनी केली असल्याच पाहायला मिळत आहे.
राज्याची तिजोरी खाली व्हायला वेळ लागणार नाही
अर्थ खात्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करताना ‘नालायक’ असा उल्लेख केला होता. मात्र, आपणही अर्थ मंत्री राहिलो आहोत. त्यामुळे प्रत्येकाला वाटत असले तरी अर्थ खात्याला खर्च करताना विचार करून काम करावे लागत असते, असे खडसे म्हणाले. कोणीही आले आणि पैसे मागितले आणि ते दिले गेले तर राज्याची तिजोरी खाली व्हायला वेळ लागणार नाही, असं सांगत एकनाथ खडसे यांनी अजितदादा यांच्या अर्थ खात्याची पाठराखण केल्याचे दिसून येत आहे.