मंत्री गिरीष महाजन यांच्यासह टीमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केले कौतुक
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये नेपाळ दुर्घटनेतील उपचार घेणाऱ्या जखमी भाविकांची जामनेर येथील गुरुदेव सेवा आश्रमचे प.पू.श्याम चैतन्यजी महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल येथील भाविकांचा काठमांडू नेपाळ येथे भीषण अपघातात जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ मुंबई येथे आणून त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. जखमी भाविकांची भेट घेऊन श्याम चैतन्यजी महाराज यांनी विचारपूस केली. वेळेवर व योग्य उपचार होत असल्याने जखमी भाविकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी येथील रुग्णांची काळजी घेण्यासाठी आ. संजय सावकारे, भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भुसावळचे उद्योगपती मनोज बियाणी आदी उपस्थित होते.
नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या भाविकांना महाराजांनी श्रद्धांजली वाहिली. अपघातग्रस्त भाविकांपर्यंत तात्काळ पोहोचून मदत कार्य, मृत्यू पावलेल्या भाविकांचे अंत्यविधी संस्कार, जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करून वेळेवर उपचार व प्रत्येकाच्या परिवाराला धीर देणे अशा सर्व प्रक्रियेत प्रामुख्याने राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराजांनी कौतुक केले आहे.