महामार्गाच्या स्थिती संदर्भात ३ सप्टेंबरला बैठक घेण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती
साईमत/ जळगाव/प्रतिनिधी :
शहराच्या हद्दीतील महामार्गावरील लागोपाठ प्राणघातक अपघाताच्या घटनेमुळे शहरवासियांत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. जनक्षोभ लक्षात घेवून आ.सुरेश उर्फ राजूमामा भोळे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. त्यांनी शहराच्या हद्दीतील समांतर रस्ते आणि बायपासचे काम त्वरित सुरु करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. महामार्गाच्या स्थितीसंदर्भात ३ सप्टेंबर रोजी बैठक घेण्याची ही विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, समांतर रस्ते आणि नवीन बायपासचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण जास्त वाढले आहे. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असल्यामुळे अपघाताच्या घटना सतत घडत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. २८ ऑगस्ट रोजी ट्रकच्या धडकेत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी पुन्हा एक वृद्ध व्यक्ती अपघातात जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचेही पत्रात नमूद केले आहे.