राष्ट्रीय महामार्गाने पुन्हा घेतला बळी ; भरधाव कारने वृद्धाला उडविले

0
64

संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’ ; आश्वासनानंतर आंदोलन मागे

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहेत. दोन दिवसांपूर्वी तरुणीसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला. घटनेचे वृत्त परिसरात समजताच संतप्त झालेल्या नागरिकांनी आहुजानगर जवळ रास्ता रोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला.

याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. यामुळे दोन तास वाहनांची कोंडी झाली. तर ठेकेदारावर कार्यवाहीसह महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. प्रसंगी आता दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचरण करण्यात आले होते.बत माहिती अशी की, शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या द्वारकानगरातील रहिवासी अजबसिंग नारायण पाटील ( वय 78) हे महामार्ग ओलांडत असतांना जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

अजबसिंग नारायण पाटील त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील शेतकरी असून तो त्याच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात रहिवासाला आहे. अजबसींग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. शनिवारी दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजताच सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला.

अपघाताची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बांभोरी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीपर्यंत तर दुसऱ्या बाजूला शिव कॉलनीपर्यंत महामार्ग ठप्प करण्यात आला होता. धडक देणारी कार ही धडक दिल्यानंतर एरंडोलच्या दिशेने निघून गेली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले होते.

यावेळी तहसीलदार शितल राजपूत, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आदींनी उपस्थित आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ११ वाजेपासून दीड वाजेपर्यंत दोन तास वाहनांची कोंडी झाली. तर ठेकेदारावर कार्यवाहीसह महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात येतील असे आश्वासन मिळाल्यानंतर सुमारे दोन तासांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here