गावावर पसरली शोककळा
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
नेपाळ येथील बस अपघातात मयत झालेल्या पुरुष-महिलांमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील अंगणवाडी मदतनीस आशाबाई बाविस्कर यांचा समावेश होता. या घटनेमुळे सुकळी गावावर शोककळा पसरली होती. २३ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह सुकळी येथे आणण्यात आला होता. त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला.
मयत आशाबाई यांना एक मुलगा अविनाश (वय ३०) हा सध्या पुणे येथे कंपनीत कामाला आहे. त्यांना दोन मुली आहे. त्यापैकी मोठी मुलगी अर्चना (वय ३३) तिचे लग्न झाले असून तिला आसोदा, ता.जळगाव येथे दिले आहे. दुसरी लहान मुलगी सुलोचना (वय २७) हिला सुनोदा येथे दिलेले आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आशाबाई यांचे पती समाधान हरी बाविस्कर हे घरी कुणाला काहीही न सांगता घर सोडून गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेले नाही. तेव्हापासून आशाबाई यांनी लहान मुलांचा सांभाळ केला होता.
दरम्यान, अविनाश आणि त्यांच्या बहिणी आई-वडील दोघींना पोरके झाले आहेत. आशाबाई यांचे माहेर मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथीलच आहे. त्या माजी सरपंच बाजीराव सोनवणे यांच्या भगिनी होत्या.