आठवड्याभरात सुधारणा करा, अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा
साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :
शिवसेना (उबाठा) चे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी येथील बसस्थानकाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. त्यांनी आपल्या शिवसैनिकांसह आगार प्रमुखाला घेराव घालून बसस्थानकातील समस्यांबाबत प्रश्नांचा भडीमार करून लवकरात लवकर बसस्थानकातील समस्या सोडविण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांच्या आत समस्या मार्गी लागल्या नाही तर इथे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्याचे मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आपल्या मतदार संघातील व बसस्थानकातील समस्यांबाबत लक्ष देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.उबाठासेनेच्यावतीने राहुल चव्हाण यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. त्यात समस्या मार्गी लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
बसस्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही, चोरीच्या घटना वाढल्या आहेत, हिरकणी कक्ष सुरू नाही, स्वच्छता नाही, पोलीस बंदोबस्त नाही यासह विविध समस्या राहुल चव्हाण यांनी मांडल्या. संपूर्ण बसस्थानकात तात्काळ सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, हिरकणी कक्ष सुरु करावा, बस स्थानकावरील महिला व पुरुष शौचालयांची दुरुस्ती करावी, वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करावी, बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, पोलीस बंदोबस्त वाढवावा. अशा मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख ॲड.प्रकाश पाटील, युवासेना शहर प्रमुख विशाल भोई, राहुल पाटील, प्रशांत सुरवाडे, उस्मान शेख, सईद शेख, किशन मोरे, पवन भोई, काशिनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
