धानोरा ते प्रेरणापीठ पिराणा पदयात्रेमुळे घडतेय एकात्मतेचे दर्शन

0
22

साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर

धानोरा ते प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद गुजरात) येथुन पदयात्रा रवाना झाली. पदयात्रेला मंगळवारी, २६ मार्च रोजी सकाळी धानोरा गावापासुन निघाली. ही पदयात्रा २६ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत असणार आहे. परमात्याकडे स्वता: पायी चालत गेले पाहिजे, ही श्रध्दा अंगी बाळगून धानोरासह इतर गावाहुन आलेल्या पदयात्रींनी व्यक्त केली. पदयात्रेत सर्वसमाजातील लोक सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन होत असते. परम पुज्य महामंडेलेश्‍वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज (फैजपूर संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेची सुरुवात २००९ पासून केली आहे. सुरुवातीला ही पदयात्रा सुरत ते प्रेरणापीठ अशी पाच वर्ष सुरु केली होती. पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते. श्रध्देने हे सर्व सतपंथी भक्त चालत जातात. निष्कलंकी नारायणाचा नामघोष करतात. सत्संगाचा लाभ घेतात. सतपंथी परंपरेचा, जीवनशैलीचा अंगीकार करुन सत्येचा प्रचार आणि प्रसार करत पदयात्रा पिराणा येथे पोहचते.

पदयात्रेत मुक्कामांच्या ठिकाणापासून अनेक जण जोडले जातात. व्यापक स्वरुप होत जाते. पदयात्रेत दररोज सकाळ, सायंकाळ महाआरती, प्रभातीपुजा, इमामशहा महाराजांचा सत्संग होतो. अनेक भाविक पदयात्रींना स्नेहभोजन देत असतात. पदयात्रेत फैजपूर, धानोरा, चोपडा, जांभोरा, शेंदुर्णी, शिरपूर, शहादा, तळोदा, कुकरमुंडा, डेडीयापाडा, राजपिपला येथील भाविक जोडले जाऊन पदयात्राचे स्वरुप मोठे होत जाते.

काय आहे प्रेरणापीठ

कलीयुग व अथर्व वेदाच्या ज्ञानावर भाष्य केले आहे. येथे सतपंथाचे प्रवर्तक इमामशाह महारांजाची समाधी आहे. त्यांनी अध्यात्म ज्ञानयोग विद्येद्वारे सतपंथाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचा जन्म काळ १२०४ ते १३०२ असा आहे. मुळ मुलतान (सध्याचे पश्‍चिम पाकीस्तान) यांनी ६१ व्यावर्षी समाधी घेतली. त्यांना सुफी संत म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्या वेळेस सांगितलेली आगाम वाणीही ही सद्याच्या स्थितीस खरी होत चालली आहे. गुढीपाडवा (चैत्र शुद्ध) या सणाच्या दिवशी पदयात्रेची पुर्णाहुती पिराणा येथे होत असते. याठिकाणी सर्व सतपंथी एकत्र जमतात. तेथील गादीपती परम पुज्य जगतगुरुनानक ज्ञानेश्‍वरदास महाराज हे संबोधन करतात, त्यात उपासना मार्ग, कळस पूजा, ज्योत, वारी यज्ञ, सतपंथाच्या शंभर क्रियांचे ज्ञान देऊन माहिती दिली जाते. व्यसनमुक्ती, उपसना भक्ती, इमामशहा महाराजांचे संपूर्ण ज्ञान भजनातून सांगितले जाते.

यावर्षी जाणाऱ्या पदयात्रेची संख्या ८० स्त्रीया, पुरुष, तरुण, तरूणी, अबालवृध्द या सर्वांचाच समावेश आहे. ही पदयात्रा १५ दिवसांची आहे. महामंडलेश्‍वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज, सर्वसमन्वय मुखी महाराज सतपंथ ज्योत मंदिर अध्यक्ष गजानन चौधरी, सतपंथ ज्योत मंदिरचे सर्व संचालक, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष माणिकचंद महाजन, विजय मुखी, धनराज मुखी, मनोहरमुखी, ईश्‍वर मुखी, कमलाकर मुखी, केशरलाल मुखी, धनराज चौधरी, धिरज महाजन, जयेश चौधरी (मुखी), प्रितम पाटील (मुखी), मुकेशमुखी तसेच सतपंथ ज्योत मंदिर धानोरा, फैजपूर संस्थानचे सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभत असते. पदयात्रींना पहिल्या दिवसाचे दुपारचे अन्नधान धानोरा येथील गोपाळ धोंडु पाटील (माजी उपनगराध्यक्ष रावेर), सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील यांच्याकडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here