साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी येत्या १ फेब्रुवारी रोजी कलानंद बालमेळावा आयोजित केला आहे. बालमेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी प्रताप तत्वज्ञान केंद्रात नुकतीच कार्यशाळा पार पडली. बाल मेळाव्याची जबाबदारी ज्या विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्या मुला-मुलींसाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.
१ फेब्रुवारीला बालमेळावा आयोजित केला आहे. बालमेळाव्याचे अध्यक्षस्थान तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगावचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख भुषविणार आहे. बालमेळाव्याचे उद्घाटन रावसाहेब रुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगावची विद्यार्थिनी पियुषा गिरीष जाधव हिच्या हस्ते होईल. बाल स्वागताध्यक्षपद डी.आर.कन्या हायस्कुल, अमळनेरची विद्यार्थिनी दिक्षा राजरत्न सरदार भुषविणार आहे. बालमेळाव्यात शालेय विद्यार्थी काव्यवाचन, समुहगीत, नाट्यछटा, कथाकथन आदी कलाविष्कार सादर करणार आहेत.
बाल मेळाव्यासाठी मंच व्यवस्थापन, कथाकथन, काव्यवाचन नाट्यप्रवेश आदींसाठी निवड झालेल्या मुला-मुलींसाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत प्रत्येक विद्यार्थ्याची कशी तयारी झाली आहे? काय बदल केला पाहिजे? याबाबत बाल मेळावा समितीचे सदस्य संदीप घोरपडे, प्रा.प्रकाश धर्माधिकारी, गिरीश चौक, वसुंधरा लांडगे, मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख, ॲड. सारांश सोनार, ॲड. कौस्तुभ पाटील, प्रा.पी.जे.जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. म.वा.मंडळातर्फे प्रा.शीला पाटील यावेळी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर तर स्नेहा एकतारे यांनी आभार मानले.
