अमळनेरला साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणार बाल मेळावा

0
64

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला १ फेब्रुवारी २०२४ रोजी बाल मेळावा होणार आहे. बाल मेळावा आयोजनासंदर्भात बैठक पार पडली. हा बाल मेळावा संपूर्ण विद्यार्थी केंद्रित असेल तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य ठरेल, असे मत बाल मेळावा प्रमुख संयोजक एकनाथ आव्हाड (मुंबई) यांनी व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी होते. यावेळी वसुंधरा लांडगे व स्नेहा एकतारे यांनी आयोजनातील प्रमुख मुद्दे मांडले. बैठकीत बालमेळावा आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध समित्यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली.

बैठकीला म.वा.मंडळाचे उपाध्यक्ष श्‍यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, मंडळाचे सदस्य बन्सीलाल भागवत, बजरंग अग्रवाल, दिनेश नाईक, सतीष देशमुख, मुकेश पाटील, रमेश सोनवणे, डॉ.कुणाल पाटील, के.पी. बागुल, राहुल ब्रह्मे, वैभव आढाव, तृप्ती खैरनार, विद्या पाटील, मनोहर नेरकर, जी.एस. चौधरी आदींची उपस्थिती होती.

अशी आहे बाल मेळाव्यासाठी नियमावली

बाल मेळाव्याचे उद्घाटक म्हणून एक मुलगा एक मुलगी यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्यांचे साहित्य क्षेत्रात कविता कथा किंवा इतर साहित्य प्रकाशित झाले असेल त्या प्रकाशित झालेल्या साहित्याला कोणी नामवंतांनी गौरविले असेल अथवा एखादा साहित्यिक पुरस्कार मिळालेला असेल अशा इयत्ता दहावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले प्रस्ताव सविस्तर माहितीसह पुराव्यासह मंडळाकडे पाठवावेत. ज्या विद्यार्थ्यांना नाटिका नाट्य प्रवेश सादर करावयाचे असतील त्यांनी मंडळ सांगेल त्यावेळेस तेथे उपस्थित राहून आपले प्रवेश सादर करावेत त्यातून निवड चाचणी होऊन बाल मेळाव्यास सादरीकरणासाठी संधी मिळेल.

ज्यांना बाल मेळाव्यात मंच व्यवस्थापनात सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपापली नावे मंडळाकडे ठराविक तारखेपर्यंत पाठवावेत. त्यांची कार्यशाळा घेतली जाईल. त्या कार्यशाळेतून निवड करून बालमेळाव्याच्या मंच व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या बालकांवर टाकण्यात येतील. बाल मेळाव्यातील विविध सत्रांचे अध्यक्ष आलेल्या साहित्यिक प्रस्तावातूनच निवडण्यात येतील त्यासाठी मंडळाकडे प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे.

बाल मेळाव्यातील उद्घाटन सत्रात व समारोप सत्रातील समूहगीतांसाठी गायनाची निवड चाचणी मंडळ सांगेल त्या दिवशी त्या ठिकाणी घेण्यात येईल. त्यातूनच निवडक मुलांना बाल मेळाव्यात समूहगीतात ‘खरा तो एकची धर्म आणि बलसागर भारत होवो’ या गाण्यांवर समूहगीत सादर करण्यासाठी संधी मिळेल. इतर अधिकार बाल मेळावा आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बाल मेळावा समिती प्रमुख तसेच मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रास्ताविक बाळमेळावा समिती प्रमुख संदीप घोरपडे तर सूत्रसंचलन भैय्यासाहेब मगर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here