नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये काही दिवसांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली होती.मुंबईत झालेल्या या लढतीत टीम इंडियाने श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला होता. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली कारण वर्ल्डकपआधी झालेल्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारताने लंंकेचा ५० धावांवर ऑलआउट केला होता आणि आता ५५ धावांवर, तेव्हा भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला होता.
श्रीलंकेच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर देशातील क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी मोठी कारवाई केली. रणसिंघे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट बोर्डावर बरखास्ताची कारवाई केली आहे. रणसिंघे यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात १९९६ च्या वर्ल्डकप विजेता संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची बोर्डाच्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याच बरोबर श्रीलंका क्रिकेटसाठी एका अंतरिम समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती आणि बोर्डाचे एका माजी अध्यक्षांचा समावेश आहे. बोर्डावरील या कारवाईच्या आधी सचिव मोहन डी सिल्वा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. गेल्याच आठवड्यात २ नोव्हेंबर रोजी भारताकडून श्रीलंकाचा ३०२ धावांनी पराभव झाला होता. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष रणसिंघे यांनी क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.दरम्यान आयसीसीकडून या कारवाईवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.