साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘माझी माती माझा देश’ संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले आहे. देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यातून देशाप्रती मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम आहे. तसेच यातून देशभक्तीची उज्ज्वल परंपरा जोपासली जाणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव पंचायत समितीच्या आवारात ‘माझी माती माझा देश’ अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील अमृत कलश नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘माझी माती माझा देश’ संकल्पनेतून प्रधानमंत्री मोदी यांनी देशातील सर्व घटकांना, अबाल वृद्ध, सर्व वयोगटातील लोक, महिला यांना एकत्र करण्याचे काम केले आहे. त्याला आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. पालकमंत्र्यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, विभाग, सर्व नागरिक, ग्रामस्थ यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या. अमृत कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा केले आहेत. सुरुवातीला पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील प्रत्येक गावातून आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले.
चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी
धरणगाव शहरातील पंचायत समिती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढत ‘माझी माती माझा देश’ च्या कलशाचे पूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करीत नेहरू युवा केंद्राच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांच्यासह मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी देशभक्तीपर गीते सादर करून चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी ‘माझी माती माझा देश’ कलश कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती विषद केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, उपजिल्हाप्रमुख पाटील, पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहरप्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, विस्तार अधिकारी कैलास पाटील, संजय धनगर, ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष सी. एन. सोनवणे, सचिव पंजाबराव पाटील, तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास संघटनेचे सचिव पंजाबराव पाटील यांनी तर आभार अध्यक्ष सी. एन. सोनवणे यांनी मानले.