जळगाव झाले शिवलोक : पांझरापोळ गोशाळेत शिवशंभू महाकालचा जयघोष

0
30

साईमत जळगाव प्रतिनिधी

शिवमहापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी माता गिरिजा यांनी वटवृक्षाची पूजा कशी केली, प्रभू पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना भगवान शिव शंकरांनी कसे दर्शन देऊन प्रणाम केला, गुरु शुक्राचार्य यांची उत्पत्ती आणि उद्धार कसा झाला, तसेच देवी सती यांच्या मनातील संशय कसा दूर झाला आणि रूद्राक्ष महिमा काय, रूद्राक्ष कसा ओळखणार, योग्य धारण केल्याने त्याचे फळ कसे मिळते, या सर्वविषयी महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) शास्त्री यांनी कथेत विषद केले.

महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी तर स्वरूप लुंकड व डी.डी.बच्छाव सर यांनी सपत्निक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. पाचव्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर माजी विधानसभा सदस्य स्मिताताई वाघ, अंजनाबाई प्रभाकर आप्पा सोनवणे, भगत बालाणी, डॉ.आश्विन सोनवणे, शरद तायडे, अ‍ॅड. दिलीप पोकळे, अमित काळे, जयेश भावसार, विनोद मराठे, अजित राणे, चेतन बांगर, प्रभाकर पाटील, संजय महाजन, दिपक बाविस्कर, राजेंद्र महाजन, संजीव पाटील, राजेंद्र कोल्हे, स्वरूप लुंकड आदींनी सपत्निक आरती केली. भक्तगणांपैकी साधना वाणी, प्रमिला बोरसे, लीना कासने, विजया झोपे आणि अविनाश वाणी यांनाही आरतीचा मान देण्यात आला.
दरम्यान कथेला विशेष उपस्थिती देणारे नाशिक येथील श्री गुरुदेव दत्त विश्वस्त संस्था सावरगाव मठाधिपती धर्माचार्य महंत महामंडलेश्वर संजय बापूजी कुलकर्णी व पोलीस पाटील प्रभाकर काशीनाथ पाटील यांच्या हस्ते पूज्य बापूजींचा आणि शिवमहापुराण समितीच्यावतीने मुख्य संयोजक आमदार सुरेश दामु भोळे उर्फ राजूमामा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजूमामांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रोता आहे म्हणून वक्त्याला विचारलं जातं. मी गेल्या 10 वर्षांपासून धार्मिक कथा आयोजित करतोय. परंतु बापूंनी सांगितले, दरवर्षी कथा आयोजित करा. म्हणून दरवर्षी कथा आयोजित करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. गेल्या 4 दिवसांपासून काही गैरसोय झाली असल्यास तुमचा मुलगा, भाऊ किंवा सेवेकरी समजून मला माफ करा. धर्म कार्य करणे सोपे आहे, पण विकास कार्य करणे कठीण आहे हे मी मान्य करतो. शहरातील सर्व विकास कामे लवकरच मार्गी लावली जातील, असेही आमदार राजूमामा यावेळी म्हणालेत.
समारोपाच्या दिवशी बापूजींनी ‘ओम नमः शिवाय’ या संगीतमय भजनासह ‘ओ भोलेनाथ दया करणा.. हम हैं तेरे भरोसे’ या भजनाने आणि भक्तांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने शिवकथेच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात केली. संपूर्ण पंडाल शिवलोकात तल्लीन झाले होते. शिवकथा ऐकताना बापूजींनी भक्तांना कोणावरही अवलंबून राहू नये हे त्यांच्या दृष्टिकोनातून समजावून सांगितले. फक्त एकच शिवशंभूवर विसंबून राहा, तुमचे जीवन धन्य होईल. असे सांगून बापू पुढे म्हणाले की, तपश्चर्येदरम्यान शिवाच्या त्रिनेत्रातून पडलेल्या पाण्याच्या थेंबापासून एक वृक्ष तयार झाला. त्यात वाढणार्‍या फळाला रुद्राक्ष म्हणतात. यामध्ये एकमुखी, दोनमुखी, तीनमुखी, चार मुखी आणि 10 मुखी असून हे फळ म्हणजेच शिव आहे. भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले, संपूर्ण ब्रह्मांड या फळामध्ये सामावलेले आहे. जो धारण करतो त्याला सुख-शांती प्राप्त होते. हे रुद्राक्ष म्हणजे माझे रूप. जे संतांद्वारे गंगाजलाने शुद्ध करून धारण केले पाहिजे. तसेच कोणताही आजार असू द्या रूद्राक्ष धारण केल्याने सर्व रोगमुक्त होतो. घरात नैराश्य, दारिद्र्य असेल तर रूद्राक्ष अभिषेक करून घरात अभिषेक जल शिंपडल्याने सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. तसेच घरातील मुले – बालक अभ्यासात कमजोर असेल, आळशी असेल तर रूद्राक्ष गाईच्या दुधात रात्रभर भिजवत ठेवून सकाळी ते दूध मुलांना दिल्याने मुले चंचल आणि हुशार होतात. हा उपाय 41 दिवस करणे अपेक्षित आहे. रूद्राक्ष कसा ओळखणार? यावर बापूंनी सांगितले की, रूद्राक्ष पाण्यात डूबला तर तो रूद्राक्ष आहे आणि पाण्यात तरंगायला लागला तर राधे राधे..!
कथासमारोपाच्या वेळी उद्योजक अशोक जैन यांनी शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले तर त्यांच्यासह आयुक्त सौ.विद्या गायकवाड, श्रीराम खटोड, भाईजी मुंदडा, भागवत भंगाळे, भालचंद्र पाटील, ललितभैय्या चौधरी, सतीश मदाने, जयेश लापसिया, डॉ.पराग चौधरी, डॉ.राहुल चिरमाडे, घनश्याम जंगले, भालचंद्र चौधरी, विलास हरि चौधरी, सुनिल भोळे, राकेश खडके, कुणाल खडके, आनंद सपकाळे ह.भ.प. सागर महाराज पाटील, सुरेंद्र अग्रवाल व शाम परिवारातील सदस्य, गिरिराज जाधव, अभिषेक जाजू, मुन्नाभाई त्रिपाठी महाराज व योगेश गर्गे या सर्वांना महाआरती करण्याचे सौभाग्य लाभले. आरती झाल्यानंतर हजारो भाविकांना प्रसाद आणि रुद्राक्षाचे वितरण अतिशय चोख करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here