साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. विकास, विकासकामांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, यासह अनेक मुद्दे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. जनसंवाद यात्रेत कुणाल पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, यावलचे आ.शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार, माजी अध्यक्ष संदीप पाटील, डी.डी पाटील, प्रभाकर सोनवणे त्यांच्या समवेत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही जनसंवाद यात्रा रविवारी दुपारी ३ वाजता अमळनेर तालुक्यात येत आहे.
सावखेडा-मुंगसे-रूंधाटी-मटगव्हाण-, पातोंडा-नंद्री-खवशी-खेडी-अमळगाव-गांधली अमळनेर असा जनसंवाद यात्रेचा मार्ग असणार आहे. सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धार-मालपूर-मारवड-कळमसरे-, निम-परत अमळनेर पुढे कुऱ्हे टाकरखेडा-म्हसले-धरणगावकडे प्रयाण होणार आहे.
जनसंवाद यात्रेत तालुक्यातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, अशी माहिती काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली.
