सोयगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तिडका आणि वाडी या दोन गावात गुरुवारी चार तास रेस्क्यू मोहीम राबवून चार सर्पमित्रांनी एक भला मोठा अजगर आणि एक मण्यार जातीचा साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.
वाडी गावात रंगनाथ जंजाळ यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेला दहा फुटांचा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र सलमान पठान, ज्ञानेश्वर जाधव, रवि राठोड़, मोहन चौधरी, रितेश चव्हाण अशा पाच जणांनी तीन तास रेस्क्यू मोहीम हाती घेत अजगरला पकडले. त्याला वाडीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यानंतर सर्पमित्रांना तिडका गावात मनोज तडवी यांच्या घरात भिंतीत मण्यार साप असल्याचे कळाले. त्यानंतर सलमान तडवी आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी तिडका गाव गाठून एक तासाच्या रेस्क्यू मोहिमेत भिंत फोडून मण्यार सापाला जीवदान देऊन पकडले. त्यालाही नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. दरम्यान सोयगाव तालुक्यात सध्याचे वातावरण विषारी प्रजातीच्या सापांसाठी पोषक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.