साईमत यावल प्रतिनिधी
आज गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यावल नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभाराला कंटाळून अचानक मोकाट गुरांनी ठिय्या आंदोलन केले याबाबत संपूर्ण यावल शहरात चर्चेचा विषय सुरू झाला आहे.
यावल नगरपरिषदेत प्रशासक राज सुरू असल्याने यावल शहरातील प्राथमिक सुविधांकडे यावल नगरपालिकेचे 90% दुर्लक्ष होत आहे.नागरिकांच्या विविध अडीअडचणी संदर्भात समस्यांबाबत काही आजी माजी नगरसेवक यावलकरांच्या हितासाठी, विविध समस्यांबाबत आणि कोणत्याही बाबतीत आपली प्रतिक्रिया देताना दिसून येत नसल्याने नगरपरिषदेच्या दैनंदिन व इतर काही महत्त्वाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने विविध समस्यांबाबत काम कोणी कसे करावे..? याबाबत संभ्रमात पडले आहेत. प्रभारी मुख्याधिकारी आणि प्रशासकराज असल्याने ठोस निर्णय घेतले जात नाहीत. शहरात विविध योजना अंतर्गत निकृष्ट प्रतीच्या मटेरियल मध्ये बांधकामे होत आहेत, कॉन्ट्रॅक्टर यांचे नेहमीचे हितसंबंध लक्षात घेता मात्र त्यांना वेळेवर बिले अदा केली जातात शहरात विविध ठिकाणी अनियमित साफसफाई,अनियमित ओला व सुका घनकचरा संकलन, मोकाट गुर- ढोर,डुक्कर,कुत्रे ठीक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे, बेकायदा,अनधिकृत उंच व खोलगट गतिरोधकामुळे यावलची जनता वैतागली आहे,यावल शहरात अनेक संघटना आहे परंतु काही संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे चांगले संबंध कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांशी असल्याने ते सुद्धा ठराविकच प्रकरणात हात घालतात हे यावल शहराचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
राज्याच्या मंत्रिमंडळात ज्या प्रकारे तीन तिघाडा आणि काम बिघाडा असे राजकारण आहे त्याप्रमाणे यावल शहरात सुद्धा चुकीच्या बेकायदेशीर आणि गैरकामांना कोणीही कोणाला विरोध करीत नसल्याने जनता हवालदिन झाली आहे. यामुळेच मुक्या जनावरांनी गुर-ढोरांनी निष्क्रिय ठरत असलेल्या नगरपरिषदेसमोर आज गुरुवार दि.२७ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपला मोर्चा वळवून ठिय्या आंदोलन केल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.त्यामुळे आता तरी नगरपालिकेच्या संबंधित सुज्ञ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून नागरिकांच्या भावना लक्षात घेतल्या नसल्या तरी मुक्या जनावरांच्या भावना लक्षात घेऊन आपली कर्तव्यदक्षता दाखवावी असे यावल शहरात बोलले जात आहे.