जिल्ह्यातील 1024 ऑनलाईन फेरफार नोंदी सर्कल आणि तलाठींनी ठेवल्या प्रलंबित

0
29

जळगाव ः प्रतिनिधी
दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेसंदर्भात खरेदी विक्री झाल्यानंतर तेथून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे थेट मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडे जाते. त्या व्यवहाराची 30 दिवसात नोंद घेणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठीस्तरावर तब्बल 1024 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत. तर जळगाव तालुक्यात अशा 104 नोंदी प्रलंबित आहेत. तलाठ्यांनी संबंधितांना नोटीस न दिल्याने जिल्ह्यात 288 फेरफार नोंदी प्रलंबित आहेत.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन फेरफार प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीच्या नोंदणीसह फेरफार प्रक्रिया एकाचवेळस करण्यात येत आहे. त्यामुळे मिळकतीवर फेरफार लावण्यासाठी नागरिकांना तलाठ्यांकडे जावे लागत नाही. दुय्यम निबंधक कार्यालये महसूल कार्यालयांशी जोडण्यात आलेले आहे.
जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र पुणे यांच्या मदतीने विकसित केलेल्या ई-फेरफार आज्ञावलीद्वारे गावपातळीवरील फेरफार प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. त कनेक्टीव्हीटीव्दारे जोडण्यात आलेली आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयेही जोडण्यात आलेली आहेत. आज्ञावलीव्दारे दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीची दस्त नोंदणी झाल्यानंतर त्या दस्तानुसार तत्काळ फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली आहे.

नोंदणी झालेल्या दस्ताची माहिती आज्ञावलीद्वारे तहसील कार्यालयात प्राप्त होते. त्यानुसार पुढील सर्व प्रक्रिया शासकीय निर्देशानुसार पार पाडली जाते. आवश्‍यक तेथे आज्ञावलीद्वारे फेरफार नोटीस तयार होत आहे. ही नोटीस स्वाक्षरीत झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयास माहिती मिळेल. दुय्यम निबंधक कार्यालयात ती नोटीस डाऊनलोड करण्यात येते. तिची प्रिंट घेऊन दस्त नोंदणीकरीता हजर असलेल्या व्यक्तींना देण्यात येते. संबंधित तलाठी व दस्तातील पक्षकारांना फेरफार नोंदीचा एसएमएस पाठवला जातो. अशा पध्दतीने दस्त नोंदणी व फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही एकत्रित होत आहे. फेरफार नोंदींसाठी सर्व प्रक्रिया आज्ञावलीप्रमाणे केली जात आहे. लवकरच जिल्हाभरातील फेरफार नोंदी अद्ययावत होणार आहेत.

त्रुटींमुळे प्रलंबित राहतात नोंदी
मालमत्ता खरेदी-विक्री, बक्षीस पत्र किंवा हक्कसोड पत्रक केले तर त्याची नोंद दुय्यम निबंधक यांच्याकडे केली जाते. त्यानंतर त्याचे कागदपत्र आणि अर्ज घेऊन ते संबंधित गावाच्या तलाठी यांच्याकडे द्यावे लागतात. खातेदाराचा पूर्ण पत्ता, मोबाइल क्रमांक, कागदपत्रांच्या त्रुटीने नोंदी प्रलंबित राहतात.
– शुभांगी भारदे, उपजिल्हाधिकारी महसूल

जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदी
मंडळ अधिकारीस्तरावर : 1 ते 3 महिने कालावधीत 568, 3 ते 6 महिने 98, सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ 23.
तलाठीस्तरावर : 1 ते 3 महिने कालावधीत नोटीस तयार करायच्या स्तरावर 16 तर 237 प्रकरणांमध्ये तलाठ्यांनी नोटीसच पाठविलेली नाही. 3 ते 6 महिने कालावधीत 11 फेरफार नोंदी नोटीस तयार करायच्या स्तरावर प्रलंबित तर 45 फेरफार नोंदी नोटीसच न बजावल्यामुळे प्रलंबित आहेत. 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ 20 फेरफार नोंदी नोटीस तयार करण्याच्या स्तरावर तर 6 फेरफार नोंदी नोटीस न बजावल्यामुळे प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here