जळगाव ः प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून प्रसिद्ध केलेल्या प्रारूप गट-गण रचनेवर जिल्हाभरातून 74 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर उद्या 10 जून रोजी सुनावणी होणार आहे.
नव्या गट-गण रचनेनुसार जिल्ह्यात 77 जिल्हा परिषद गट, 154 गणांची रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रारूप रचनेवर जनतेतून हरकती मागवण्यात आल्या होत्या. 8 जूनपर्यंत एकुण 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर 10 जून रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेतली जाणार आहे. दरम्यान, 6 जून रोजी 8 हरकती, 7 जून रोजी 29 तर 8 जून रोजी शेवटच्या दिवशी 37 हरकती दाखल केल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील यावल व चाळीसगाव तालुक्यात प्रत्येकी 5 हरकती घेण्यात आल्या असून जळगाव तालुक्यात ही संख्या 7 आहे. याशिवाय जामनेर – 6, पाचोरा – 4, रावेर – 3, धरणगाव – 2, भुसावळ, एरंडोल, बोदवड, अमळनेर, मुक्ताईनगर प्रत्येकी 1 हरकत अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभार रचना नुकतीच जाहीर करऱ्यात आली होती. त्यात गट आणि गणांमध्ये वाढ झाल्याने सर्वच प्रभागांची फेररचना झाली आहे. काही ठिकाणी जुन्या गटातील गावे शेजारच्या गटात गेली आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपल्या हक्काची गावे गेल्याने त्यावर हरकती घेतल्या आहेत.
दरम्यान, 2 जून ते 8 जून दाखल करण्याची मुदत होती. मात्र 2 ते 5 जून दरम्यना जिल्ह्यातू एकही हरकत दाखल करण्यात आली नव्हती. 6 जून रोजी 8, 7 जून रोजी 29, आणि 8 जून रोजी 37 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
एकूण 74 हरकती दाखल झाल्या असल्या तरी या हरकती किती गांभीर्याने घेतल्या जातील त्याचा अंदाज जि.प. व पं.स. सदस्यांना नाही. तसेच नाशिक विभागीय आयुक्तांकडे सुनावणी ठेवल्यामुळे हरकतीवरील सुनावणीसाठी किती जण प्रत्यक्ष उपस्थित राहतात यावरही सारे काही अवलंबून आहे. या हरकतींवर जळगावला जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी घ्यायला हवी होती अशी अपेक्षा काही जि.प. सदस्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हरकतींपेक्षा आरक्षणाची सोडत काय निघते याची चिंता सदस्यांना लागली आहे. कारण त्यावरच अनेकांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.
