जळगाव ः प्रतिनिधी
जलजीवन मिशनच्या अंतर्गत येथील पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून याचे काम सर्व निकषांच्या आधारे करण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. सदर कामाच्या कंत्राटदाराला पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यादेश प्रदान करण्यात आला.
या संदर्भातील वृत्त असे की, शासनाच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत असून याच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुध्द पाणी पोहचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तब्बल 870 गावांसाठी या योजनेच्या माध्यमातून कृती आराखडा आखण्यात आला असून यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या गावांमध्ये याचे काम सुरू झाले आहे.
या अनुषंगाने आज जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील पाणी पुरवठा योजनेचा कार्यादेश प्रदान करण्यात आला. या योजनेसाठी 35 लक्ष, 89 हजार, 239 रूपयांची मान्यता मिळाली आहे. कंत्राटदार अनंत राधेश्याम पाटील यांना आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कामाचा कार्यादेश प्रदान करण्यात आला. या योजनेच्या प्रत्यक्ष कामास लवकरच विधीवत पुजन करून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तर कंत्राटदाराने शासकीय नियमानुसार ही योजना कार्यान्वीत करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील दिले. याप्रसंगी, विकासो चेअरमन शिवाजी सोनवणे, माजी सरपंच अनिल सपकाळे, गुड्डू भाऊ, शाखा प्रमुख किरण सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे आदींची उपस्थिती होती.
