जामनेर:(प्रतिनिधी) :-
भारतीय संस्कृतीत नारीला विशेष महत्व प्राप्त आहे. आपण नारी पूजन का करतो ? तर माता भुवनेश्वरी ने स्वामी विवेकानंद सारखे रत्न दिले. त्यांचे पूर्ण जगात नावलौकिक झाले. त्याच प्रमाणे माता जिजाऊने सुध्दा समस्त समाजा च्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या दिव्य पुत्राला जन्म दिला. त्यांनी हिंदूंचेच नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे रक्षण व स्वराज्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. माता जयवंताबाईंनी महाराणा प्रताप सारखा शूर, वीर, पराक्रमी, तेजस्वी, ओजस्वी असा सुपुत्र जन्माला घातला या सुपुत्रांना घडवण्यात आईची भूमिका सर्वश्रेष्ठ राहिली आहे.
आज आमच्या आया-बहिणींनी सुध्दा मुलांना चांगले संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. डोक्यावर केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा चांगले संस्कार आणि विचार देऊन विवेकानंद घडवावे.अशा पद्धतीने आईने संगोपन करून सुसंस्कृत पिढी घडवावी .आज मुले संस्कारहीन होताना दिसत आहे. ती संस्कार हीनता आपल्या भारतीय संस्कृतीला अशोभनीय व मारक ठरत आहे. ‘ जब तक संस्कृती हैं तब तक आस है, बिना संस्कृती मनुष्य का विनाश है.’ म्हणून आज आपण महिलांचा गौरव करीत आहोत असे श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट गादीपती श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी सांगितले. श्री गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन समाजाभिमुख उपक्रम राबविले जातात.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील नगर परिषदेच्या सभागृहात महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जामनेर शहरातील महिला पत्रकार, नगर परिषदेतील महिला कर्मचारी, नगरपरिषदेच्या महिला सफाई कर्मचारी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर वस्त्र दान हे श्रेष्ठ दान असल्याने ट्रस्टतर्फे सर्व महिला भगिनींना साडी भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी सन्मानित महिला भगिनींनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना शिंदे तर सूत्रसंचालन संजय पवार, आभार प्रविण राजनकार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



