साईमत, मुंबई ः प्रतिनिधी
सरकारच्या विविध संस्थांअंतर्गत ज्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, त्याच्या संख्येत मोठी घट करण्यात आली आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय अंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी घट करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. बार्टी संस्थेकडून आता ८६१ च्या ऐवजी २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, तर सारथीमधील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ६०० वरून ५० वर आणण्यात आली आहे. महाज्योतीमध्ये देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये घट करण्यात आली असून ती १२०० वरून थेट ५० वर आणण्यात आली आहे. तर टीआरटीआय १४६ च्या ऐवजी १०० जणांनाच शिष्यवृत्ती देण्य़ात येणार आहे. सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.