जळगाव ः प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर तसेच राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.दीपस्तंभ फाउंडेशन 2009 सालापासून सेवाभावी काम करणाऱ्या तरुणांना व ज्येष्ठांना दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करत आहे.2017 पासून हे पुरस्कार स्व.डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जातात.सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे व समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात.
2021-22 या वर्षासाठीचे पुरस्कार खालील प्रमाणे आहेत.संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या जेष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या वर्षाच्या जीवन गौरव पुरस्काराने विदयार्थी सहाय्यक समितीचे रमाकांत तांबोळी (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.समाजामध्ये अतिशय कमी कालावधी मध्ये कामाचा व्यापक परिणाम साधणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विवेकानंद पुरस्कार दिला जातो.पाणी फाऊंडेशन’ आणि विशेष म्हणजे या वर्षी उबुंटु’ चित्रपटातील ’माणसाने माणसाशी माणसांसम वागणे” या गीताला विवेकानंद पुरस्कार दिला जात आहे.पाच ते सात वर्ष काम करत असलेल्या तरुण व्यक्तींना युवा प्रेरणा पुरस्कार दिला जातो. सुरवातीच्या काळातच सामाजिक कामाला कौतुक व प्रेरणेची आवश्यकता असते.त्यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पूर्ण वेळ सातत्याने काम करत असलेल्या तरुणांना युवा प्रेरणा पुरस्कार दिला जातो.
युवा प्रेरणा पुरस्कार खालील प्रमाणे आहे.स्नेहालयचे स्व.विशाल अहिरे (अहमदनगर ) यांना मरणोत्तर युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.रेडिओ उडानचे दानिश महाजन (पठाणकोट),मिरॅकल फाउंडेशनची मयुरी मदन सुषमा (पुणे ), सकाळ वृत्तपत्राचे संदीप काळे (मुंबई ), मिशन 500 कोटी जलसाठा ( चाळीसगाव ), बुकलेट अपचे अमृत देशमुख (ठाणे ), योगी फाऊंडेशनचे गिरीश पाटील (चोपडा).
कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे सोबतच दीपस्तंभ प्रकाशित व प्रा.डॉ.एल.ए.पाटील लिखित सुसंस्कृत व्यक्तिमत्व या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे .पुरस्कार सोहळा 24 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 5:15 वाजता छत्रपती राजे संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.या प्रेराणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्यने जळगावकरांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन यजुर्वेंद्र महाजन यांनी केले आहे.