नवी दिल्ली :वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात भाजपने मोठी भरारी घेतल्याचे दिसून आले. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल भविष्यवाणी केली आहे.
गिरी यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार राष्ट्रवादाच्या नावावर मोदी स्वत: पंतप्रधानपद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असे सूचक वक्तव्य महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केले आहे. महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी ही भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास 12 वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. 12 वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी स्वतः राजकारणापासून दूर होण्याचा निर्णय घेतील, असे गिरीयांनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदीनंतर योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान होतील असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास समाजासमोर एक आदर्श ठेवतील. मोदी 2014 पासून भारताच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीनंतरही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा विराजमान होतील. मात्र, दोन वर्षांमध्ये म्हणजेच 2026 मध्ये राजकीय संन्यास घेतील, असा दावा गिरी यांनी केला. पंतप्रधान मोदींचा 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे दिल्लीच्या तख्तावर बसणार आहेत, असे भाकीत गिरी यांनी वर्तविले आहे. योगींनी पंतप्रधान होऊन हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी इच्छा गिरी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून आपले वर्चस्व प्रस्थपित केले आहे.