येवला ः प्रतिनिधी
नाफेडचा कांद्या विक्रीसाठी बाहेर पडू देणार नाही, वेळ पडल्यास तो जाळून नष्ट केला जाईल, असा इशारा देतानाच आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीनंतर जर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या तर त्यांचे हात तिथेच छाटू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी येथे दिला.
येथील बाजार समिती आवारात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. येत्या 30 जूनपर्यंत वाणिज्य तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेटीसाठी वेळ मागण्यात येईल. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालण्याचा इशाराही ज्येेष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील व बहाळे यांनी दिला.
ज्यांनी नाफेडला कांदा विकला त्यांनीही या आंदोलनात सामील व्हावे. बांगलादेशसारख्या देशाने सौदे पूर्ण केले जात नाही म्हणून आपला कांदा विकत घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला. आखाती देशांनी सुद्धा येमेनमधून कांदा खरेदी सुरू केल्याने निर्यातबंदीच्या धोरणामुळे आपल्या कांद्यावर गदा आल्याची वेळ आल्याचे मत बहाळे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार वामनराव चटप म्हणाले की, जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब जोपर्यंत सरकारमध्ये उमटत नाही तोपर्यंत सरकार जनतेसाठी निरुपयोगी असते. ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील म्हणाले, जोपर्यंत जीवनावश्यक यादीतून कांदा वगळला जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव असेच कोसळत राहणार आहेत. महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सीमा नरवडे म्हणाल्या, केंद्र सरकार नेहमी निर्यातबंदीच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने कांद्याचे दर पडतात. नाफेड ही शेतकऱ्यांसाठी व्यवस्थाच नसून ही व्यवस्था बंद करायला हवी असे मत देविदास पवार यांनी मांडले.
युवा आघाडीचे अध्यक्ष सुधीर बिंदू यांनी नाफेडचा कांदा विक्रीसाठी आणल्यास त्याच ठिकाणी तो जाळून टाकू, नाफेडची राज्यातील कार्यालये बंद पाडू असा इशारा दिला. शंकरराव ढिकले यांनी ठराव मांडले.