मुबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या निर्णयावरून आता राज्यातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामान्य जनतेमधून मात्र आधीच कोट्याधीश असणाऱ्या आमदारांना पुन्हा मोफत घरे कशासाठी? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं या निर्णयाचा समाचार घेताना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
“खर्च कुणाच्या सांगण्यावरून?”
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना हा खर्च कुणाच्या सांगण्यावरून केला जात आहे, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. “मुळात हे कशासाठी हवंय? आमदार निवास उपलब्ध आहे. निवडून येणाऱ्या आमदारांची मुंबईत येतात तेव्हा राहण्याची सोय होते. मग ही मोफत घरं कशासाठी? राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट आहे. शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जात नाहीत. वीज कापणी जोरात सुरू आहे. एसटी कर्मचारी पगार होत नाहीत म्हणून संपावर आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचीही अशीच अवस्था आहे. पैसे नाहीत म्हणू नोकरभरती होत नाही. मग हा अवाढव्य खर्च नेमका कशासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.